नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
गारठा वाढला; गोंदिया ११ अंशांवर
राज्यात असलेले कोरडे हवामान, उत्तरेकडून वाहत असलेले थंड वारेचे प्रवाह यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. या थंडीमुळे राज्यातील काही भागांत किमान तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे.
पुणे : राज्यात असलेले कोरडे हवामान, उत्तरेकडून वाहत असलेले थंड वारेचे प्रवाह यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. या थंडीमुळे राज्यातील काही भागांत किमान तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे. तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांत थंडी राहणार आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ११ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जम्मू आणि काश्मीर परिसरात बर्फवृष्टी होऊ लागली आहे. यामुळे उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तरांखड या भागांत थंडीची लाट आली आहे. या भागात दिवसही थंड अनुभवास येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागांत थंडीची लाट राहणार आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. राजस्थानच्या पूर्व भागातील सिकर येथे १.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. उत्तरेकडील या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा दोन ते तीन दिवसांत झपाट्याने खाली आला आहे.
सध्या राज्यात आकाश निरभ्र असल्याने थंडी चांगलीच वाढली आहे. ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. विदर्भातील अनेक भागांत थंडी वाढली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. या भागात ११ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान आहे. मराठवाड्यातही बऱ्यापैकी थंडी आहे. त्यामुळे परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात १३.५ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद, उस्मानाबाद भागांतही थंडी आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. पुणे, जळगाव, नाशिक, निफाड, महाबळेश्वर या भागांत चांगलीच थंडी आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांत थंडी काहीशी कमी आहे. कोकणात थंडीत चढउतार असून ठाणे, डहाणू परिसरांत चांगलीच थंडी आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी भागांत थंडी काहीशी कमी असल्याने किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २२ (५), ठाणे १९, अलिबाग २१.३ (४), रत्नागिरी २२.२ (३), डहाणू २०.३ (३), पुणे १५.९ (५), जळगाव १५.७ (३), कोल्हापूर १९.३ (४), महाबळेश्वर १५.५ (२), मालेगाव १९.६ (८), नाशिक १६.८ (७), निफाड १५, सांगली १८ (४), सातारा १६ (४), सोलापूर १८.५ (३), औरंगाबाद १५.८ (३), बीड १७.४ (४), परभणी १७.४ (३), परभणी कृषी विद्यापीठ १३.५, नांदेड १८ (४), उस्मानाबाद १४.९, अकोला १६.६ (२), अमरावती १५.५ (१), बुलडाणा १५.८ (१), चंद्रपूर १७.४ (३), गोंदिया ११ (-२), नागपूर १५ (२), वर्धा १५.९ (३), यवतमाळ १६ (१)
- 1 of 657
- ››