काळजी घ्या.. राज्यात थंडीची लाट !

थंडी
थंडी

पुणे: उत्तरेकडील राज्यांमधून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे. शुक्रवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २९) राज्यातील थंडी कायम राहणार असून, विदर्भात लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.  पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांमध्ये गोठविणारी थंडी आली आहे. पंजाबच्या भाटींडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या भागात १ जानेवारीपासून पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढणार असल्याने उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातही हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. हे वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातही थंडीचा कडाका कायम राहणार आहे.  राज्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी घटले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची तीव्रता अधिक असून, नागपूरच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ७ अंशांची घट झाली आहे. जळगाव, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने तर निफाडमध्ये तापमान ४ अंशांवर आल्याने थंडीची लाट आली आहे. पुणे, नाशिक, मालेगाव, महाबळेश्वर, औरंगाबाद, उस्मानाबाद, गोंदिया येथेही तापमान १० अंशांपेक्षा खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ७.४(-३.७), जळगाव ६.४ (-४.९), कोल्हापूर १५.९(०.६), महाबळेश्‍वर ९.६(-३.६), मालेगाव ७.८ (-२.५), नाशिक ६.९(-३), सांगली ११.९(-२.६), सातारा १०.७ (-२.२), सोलापूर ११.६(-४.३), सांताक्रूझ १५.८(-१.६), अलिबाग १५.२(-२.८), रत्नागिरी १७.३(-२.३), डहाणू १३.५(-४.१), आैरंगाबाद ८.२(-३.२), परभणी ८.९ (-५.१), नांदेड १२.०(-०.७), उस्मानाबाद ९.७, अकोला ८.५(-४.८), अमरावती १०.६(-३.६), बुलडाणा ८.५ (-५.६), चंद्रपूर १०.०(-३.३), गोंदिया ८.५(-३.७), नागपूर ५.७(-६.९), वर्धा १०.५(-२.२), यवतमाळ १०.०(-४.१). वाढत्या थंडीपासून पिकांचे संरक्षण  वाढलेली थंडी गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी पोषक असून, त्याचा या पिकांना फायदा होईल. सध्या ज्वारी अनेक ठिकाणी हुरड्याच्या स्थितीत आहे. या वाढलेल्या थंडीमुळे पहाटे धुके आणि दव पडल्यास ज्वारीवर चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. करडई, कांदा, लसूण, तूर या पिकांवर सध्याच्या स्थितीमध्ये थंडीचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र, मागील चार पाच दिवसांपूर्वी तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष द्यावे. वाढलेल्या थंडीसाठी फळपिके तुलनेने अधिक संवेदनशील असतात. बागेला रात्री किंवा पहाटेच्यावेळी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. केळी पिकामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास बागेभोवती ओला काडीकचरा, गवत जाळून धूर करावा. झाडाभोवती वाळलेली पाने तशीच लपेटून ठेवावीत. बागेमध्ये सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील तापमान टिकून राहते. बहुतांश सर्व पिकांमध्ये रात्रीच्यावेळी पाणी दिल्यास पिकांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते.   ः ०२४२६ - २४३२३९ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) अतिथंडी सर्वच पिकांना मारक राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वसाधारणपणे तापमान ८ अंशांपेक्षा खाली घसरल्यास सर्वच पिकांना थंडी मारक असते. पिके थंडीपासून बचाव करण्याच्या स्थितीत असतात. पिकांचे तापमान आणि वातावरणातील तापमान यातील तफावत वाढते. त्याप्रमाणात नुकसान पातळी वाढू शकते. अति थंडीमुळे द्राक्ष मण्यांना भेगा पडतात. धुके व दव यामुळे फळांचे नुकसान वाढते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव होते. वाढणाऱ्या वेली खराब होतात. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षबांगाना फटका बसतो. पिंकबेरीचे प्रमाणही वाढू शकते. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळच्या वेळी द्राक्षबागेत छोट्या छोट्या शेकोट्या पेटवाव्यात. त्यामुळे बागेतील तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होऊन नुकसान पातळी कमी करता येते. मुळांचे तापमानाही योग्य राखणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येत असेल, तर सायंकाळच्या वेळी द्यावे. आंबा बागेवरही थंडीचा मोठा परिणाम होतो. झाडांना मोहर उशिरा निघतो. आंबा बागायतदारांनी बागेत काडीकचरा, पालापाचोळ्याच्या शेकोट्या कराव्यात. या शिवाय गहू, हरभरा, ज्वारी, मोहरी, सूर्यफूल, ऊस यांसह सर्वच भाजीपाला पिकांना अतिथंडी मारक ठरते. या पिकांना सायंकाळच्या वेळी पाणी देणे उपयुक्त ठरेल. - डाॅ. रामचंद्र साबळे, ज्ये ष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com