विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा जिंकल्याच पाहिजेत : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने किमान २२० जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे, असा निर्धार व्यक्त करत, जिथे भाजप उमेदवार असतील तिथे तसेच जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजप निवडणूक लढणार आहे असे मानून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. 

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात रविवारी आयोजित विशेष कार्य समितीच्या बैठकीत श्री. पाटील यांनी या सूचना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतीश, प्रदेश संघटन महासचिव विजयराव पुराणिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बळकट केलेली पक्षसंघटना, फडणवीस सरकारची यशस्वी कामगिरी या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेतच, आता पुन्हा एकदा आपल्याला जनतेकडे त्यांचे असेच भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी जायचं आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता आपल्या पाठीमागे नक्कीच ठामपणे उभी राहील.

शिवसेना-भाजप युतीबाबत श्री. पाटील म्हणाले की, युतीचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी जाहीर करतील. तो निर्णय आपण त्यांच्यावर सोपवला पाहिजे. पण आपण सर्वांनी सर्व ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करताना श्री. पाटील म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे. रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी क्रांती घडवली. वारीला निर्मल वारी बनविण्यासाठी स्वच्छ वारी - निर्मल वारी मोहीम, वारकऱ्यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची मोठी सोय केली, हे ७० वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का जमलं नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करणाऱ्यांना बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या, असा सवालही श्री. पाटील यांनी विचारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com