सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट 

सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅगांपेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
Condition for transportation of soybean seeds
Condition for transportation of soybean seeds

पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅगांपेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. 

गेल्या हंगामात निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या ६२ हजारांहून जादा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी काही जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली होती. त्यात पुन्हा उच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करीत एक जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे राज्य सरकारने ५४ ठिकाणी सदोष बियाण्यांबाबत फौजदारी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच सावध होत नव्या अटी लागू केल्या आहेत. 

सोयाबीन बियाण्याचे आवरण नाजूक असल्याने बियाण्याच्या उगवणीवर परिणाम होतो. त्यामुळे बियाण्याची वाहतूक व साठवणूक करताना सात बॅगांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. बियाणे विक्रेत्यांनी त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे मागणी करावी व दहा टनांपेक्षा जास्त बियाणे एका वाहनातून न पाठवण्याबाबत कळवावे, असा आदेश कृषी विभागाने जारी केला आहे. त्यामुळे कंपन्या, विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. 

सोयाबीन बियाण्याची वाहतूक व साठवणुकीवर यंदा कृषी विभागाच्या निरीक्षकांची नजर राहील. “मोठी थप्पी आढळून आल्यास व त्याच बियाण्याबाबत शेतकऱ्याकडून तक्रार आल्यास आम्ही विक्रेते व संबंधित कंपनीला संयुक्तपणे जबाबदार ठरविणार आहोत,” अशी माहिती एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली. 

बियाणे कंपन्यांनी कृषी विभागाच्या नव्या अटींबाबत मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “७० टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता असलेल्या बियाण्याची कोणालाही विक्री करू नये. दुकानात विक्रीसाठी आलेल्या बियाण्याचे वाणनिहाय, कंपनीनिहाय नमूद काढावे. त्याची उगवणक्षमता चाचणी घ्यावी व स्वतंत्र नोंदवहीत नोंदी ठेवाव्यात अशाही सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा विक्रेत्यांनी व्यवसाय करायचा की फक्त नमुने घेण्यात हंगाम घालवायचा. कृषी विभागाच्या या अटी केवळ आर्थिक अडवणुकीसाठी केलेली तरतूद आहे,” अशी तक्रार एका बियाणे उत्पादक कंपनीच्या संचालकाने केली आहे. 

चांगल्या व्यावसायिकांनी घाबरू नये  कृषी विभागानुसार, ‘‘शेतकरी व कंपन्या या दोन्ही घटकांच्या हितासाठी सोयाबीन बियाण्यांची विक्री नियमावली तयार करण्यात आली आहे. दर्जेदार बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या व अधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. बियाणे चांगले असल्यास त्याची उगवणक्षमता चाचणी घेण्यासाठी टाळाटाळ करून उगाच संशयाचे वातावरण काही विक्रेते तयार करीत आहेत. मात्र आम्ही यंदा चुकीची कामे करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार केलेला आहे,” असा दावा गुणनियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com