कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार हवा ः डॉ. चारुदत्त मायी

परिसंवादात बोलताना डॉ. चारुदत्त मायी
परिसंवादात बोलताना डॉ. चारुदत्त मायी

औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना तो आंधळेपणाने न करता डोळसपणे करायला हवा. जग कुठं चाललं हे पाहायला हवं. तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे स्वातंत्र्य हवेच. शेती झिरो बजेटची किंवा बीटीची होऊच शकत नाही, असे मत कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केले. 

औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय परिसरातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात रविवारी (ता. २१) ‘शेती ः झिरो बजेटची की बीटीची? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. शेतकरी संघटना न्यास आणि देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शालीग्राम वानखेडे प्रमुख पाहुणे होते. या वेळी डॉ. भगवानराव कापसे, त्र्यंबकराव पाथ्रीकर, गोविंद जोशी उपस्थित होते.

``शेतकऱ्यांना शेती पद्धती शिकविण्यात कमी पडलो हे मान्य करावे लागेल, परंतू शेतीविषयक संशोधनात शास्त्रज्ञांनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीलाही विसरून चालणार नाही``, असे डॉ. मायी यांनी सांगितले. ते म्हणाले, की शेती झिरो बजेटची किंवा बीटीची होऊच शकत नाही. जगात शेती संशोधनात जनुक संपादनाकडे (जेनेटिकल एडिटिंग) कल वाढला आहे. एखादे जनुक अंतर्भूत करण्याऐवजी आरोग्याला बाधक असे नको असलेले जनुक काढून टाकण्याचे काम या तंत्रज्ञानातून होते आहे. एकेकाळी शेतकरी अन्नधान्य पिकत नव्हतं म्हणून आत्महत्या करीत होता, आता अन्नधान्य असूनही शेतकरी आत्महत्या होत आहेत, याकडे डॉ. मायी यांनी लक्ष वेधले.

उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाची कास आपण धरली, परंतू अमेरिकेप्रमाणे उत्पादित मालाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपण निर्माण केली नाही. उगवल्यापासून विक्रीपर्यंतच तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे उत्पादित शेतीमालाचे दर शेतकऱ्यांच्या हातात राहिले नाहीत. दुसरीकडे अमेरिका व इंग्लंडसारख्या प्रगत देशात अनुक्रमे चार व दीड टक्‍के लोकच शेतीवर अवलंबून आहेत. आपल्याकडे मात्र तब्बल ५२ टक्‍के लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. युवा पिढीला शेतीच ज्ञान द्यायला हवं. त्यासाठी महाविद्यालयांमधून जागर करायला हवा, असे ते म्हणाले.

झिरो बजेट शेतीची संकल्पना १५ वर्षांपूर्वी येऊनही ती का फोफावली नाही याचा विचार करण्याची गरज असल्याचे डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी सांगितले. एचटीबीटी तंत्रज्ञानाबाबत वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्याच्या चाचण्या घेतल्या पाहिजेत. त्याविषयी शासन स्तरावरून सकारात्मक विचार होणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

लक्ष्मण नेहे, भारत रानरूई, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, अजित नरदे, कैलास तंवार, जयश्री पाटील या वक्त्यांनी यावेळी विचार व्यक्त केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com