सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही.जनावरांची भूक मंदावून उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. हे लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत. जनावरांच्या आहारातील पोषण मुल्यापैकी २० ते ३० टक्यांपर्यंत सत्त्व परोपजीवी खात असल्याने पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. जंताचे प्रमाण कमी असताना विशेष लक्षण न दिसल्याने होणारे नुकसान जास्त असते. कारण प्रथम दर्शनी जनावर निरोगी दिसते. असे हे नुकसानकारक परोपजीवी आंत्र व बाह्य दोन प्रकारचे असतात.
आंत्र परोपजीवीमध्ये गोल कृमी, चपटे कृमी व पर्णाकृती असे तीन उप प्रकारात आढळतात. बाह्य परोपजीवीमध्ये उवा, गोचीड, लिखा, गोमाशी, डास यांचा समावेश होतो. एकपेशीय परोपजीवी हा सुद्धा एक नुकसान कारक प्रकार आढळून आहे. जनावरांमधील बाह्य परोपजीवी
जनावरांमध्ये आढळणाऱ्या विविध परजीवींपैकी गोचीड हा एक महत्त्वाचा परजीवी आहे. जनावरांत रक्त शोषण करण्याबरोबर जीवघेणे आजार पसरविण्याचे काम गोचीड करतात. एक गोचीड साधारण १ ते २ मिली रक्त शोषण करते. त्यामुळे रक्तक्षय होतो. गोचीड चावल्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात, त्यामुळे त्वचारोग होण्याची संभावना असते. गोचीड ताप हा एक भयंकर आजार पसरतो. हा एक जीवघेणा आजार असून जनावराची अपरिमित हानी करतो. गोचिडनाशकांचा वापर पशूतज्ज्ञांच्या सल्यानेच करावा. गोचीड निर्मुलन कार्यक्रम हाती घेताना एकाच वेळी संपूर्ण गोठ्याचे गोचीड निर्मुलन करावे.औषध योग्य मात्रेत वापरावे जनावराच्या अंगावरील गोचिडांपेक्षा जास्त गोचीड गोठ्यात सापडत असल्याने गोठ्यातही औषध फवारणी करावी. गोठ्यात औषध फवारताना मात्रा दुप्पट करावी. गोचिडाच्या अंडी अवस्थेवर औषधांचा परिणाम होत नसल्याने २१ ते २५ दिवसाच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी. औषध फवारणी वारा शांत असताना करावी. गोचिडनाशक चारा, पाणी यावर उडणार नाही याची खात्री करावी. जनावर गोचिडनाशक चाटणार नाही, या करिता फवारणी पूर्वी पाणी पाजावे. गोचिडनाशक फवारणी करणाऱ्या व्यक्तीने योग्य खबरदारी घ्यावी. उदा. फवारणी करताना औषध तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी नंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. परोपजीवींमुळे होणारे नुकसान
नवीन कालवडी, पारड्या, बकरे, करडे यांची वाढ व्यवस्थित होत नाही. जनावरांची भूक मंदावून उत्पादन व प्रजोत्पादनात घट येते. जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होऊन जनावर कायम आजारी पडते. लसीकरणाचा योग्य परिणाम दिसत नाही. जनावराचे पचन बिघडून शेण पातळ होणे, शेणाचा वास येणे, शेणात आव पडणे अशी लक्षणे दिसून येतात. जनावराच्या त्वचेची चमक कमी होऊन केस राठ होतात. वाढीच्या वयातील कालवडी, पारडी व गोऱ्हे यांचे पोट ढेबरे होते. त्यांचे वजन वाढ योग्य प्रमाणात होत नाही. जनावर गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनात घट येते. सर्वसाधारणपणे वर्षातून तीन ते चार वेळा जंत निर्मुलन करावे. बंदिस्त किंवा एकाच जागी असणाऱ्या जनावरांकरिता तीन वेळा आणि चरावयास जाणाऱ्या जनावरांकरिता चार वेळा जंत निर्मुलन करणे गरजेचे असते. ऋतू बदलावेळी म्हणजे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर हिवाळा संपताना आणि गरज भासल्यास पावसाळ्याच्या मध्यावर जंत निर्मुलन कार्यक्रम करणे गरजेचे असते. वाढीच्या वासरांमध्ये योग्य प्रकारे जंत निर्मुलन कार्यक्रम केल्यास खूपच सकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा बाबींमध्ये १२ ते १३ महिने वयाची कालवड लागवड योग्य म्हणजे २५० किलो वजनाची झाल्याची उदाहरणे दिसून आलेली आहेत. जंत निर्मूलनाकरिता शिफारशीत औषधांचा वापर करावा. जंत निर्मुलन करताना काळजी घेणे गरजेचे असते. सर्व जनावरांना एकाच वेळी जंत निर्मुलन करावे. गाभण जनावरांना पशूतज्ज्ञांच्या सल्यानेच उपचार करावेत. औषध योग्य मात्रेतच द्यावे, त्याकरिता वेष्टनावरील सूचना पाळाव्यात. जास्त मात्रा अपायकारक तर कमी मात्रा योग्य परिणाम कारक दिसून येत नाही. प्रत्येक वेळी औषध बदलून द्यावे. म्हणजे जंतामध्ये औषधी प्रतिरोधशक्ती विकसित होणार नाही. औषध सकाळी चारा देण्यापूर्वी उपाशी पोटी दिल्यास परीणामकता वाढते. जास्त प्रादुर्भाव असल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा औषध पाजावे. लसीकरण करण्यापूर्वी जंत निर्मुलन केल्यास लसीची परिणामकता वाढते. संपर्क- डॉ. गुणाजी यादव, ८७६६८७५५४६ (पशुवैद्यकीय शरीररचना शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय , शिरवळ,जि.सातारा)