गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. बहुतांश ठिकाणी गहू पिकाची पेरणी आटोपली आहे. मात्र, अद्याप गहू पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झालेले नाही. डिसेंबरअखेरीलाही किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, तर कमाल तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपल्या राज्यात गहू पिकावर प्रामुख्याने तांबेरा, पानावरील करपा, रोप मर व गव्हावरील काजळी हे रोग आढळून येतात. सध्याच्या वातावरणात नारंगी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अन्यथा उत्पादनात घट येऊ शकते. तांबेरा हा गहू पिकावरील सर्वात महत्त्वाचा रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर दुर्लक्ष केल्यास उत्पादनामध्ये ८० ते १०० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आर्द्रता अशा प्रकारचे पोषक हवामानात संवेदनशील गहू जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास दाण्यांवर सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होतात. महाराष्ट्रामध्ये गहू पिकावर दोन प्रकारचे तांबेरा आढळतात. सुरवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
काळा किंवा खोडावरील तांबेरा
काळा तांबेरा हा पक्षीनिया ग्रामिणीस ट्रीटीसाय या बुरशीमुळे होतो. त्याचे प्रमाण भारतातील मध्य, पूर्व व दक्षिण भाग भागामध्ये विशेषतः जेथे हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असते अशा ठिकाणी आढळून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूंमुळे पानाच्या वर-खाली दोन्ही बाजूवर होतो. मात्र, अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो. पानावर किमान ६ ते ८ तास ओलावा किंवा दव साचलेले असणे व तापमान १५ ते २४ अंश सेल्सिअस असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र, तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो. काळा तांबेरा रोगाच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा रोगापेक्षा साधारण ५.५ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची गरज असते. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे अंडाकृती ते लंब वर्तुळाकार लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने त्या ठिकाणी बुरशीच्या विटकरी रंगाच्या बीजाणूची पावडर दिसून येते. या भुकटीमध्ये बुरशीचे असंख्य बीजाणू असतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नारंगी किंवा पानावरील तांबेरा
हा रोग पक्षीनिया ट्रीटीसीना या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशीच्या बिजाणूंमुळे होतो. रोगाची प्रादुर्भाव होण्यासाठी १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान ३ तास दव साठलेले असावे लागते. प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसतात. अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होतात. ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. अशा रोगग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची पावडर बोटांना लागते. फुलोऱ्यापूर्वीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास ८० टक्क्यांपर्यंत तर बाल्यावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते. तांबेरा रोगाचे व्यवस्थापन
महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणांची पेरणी करावी. उदा. फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एन.आय.ए.डब्लू. ३४, एम.ए.सी.एस. ६२२२, एम.ए.सी.एस. ६४७८, गोदावरी, पंचवटी इ. विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणेच खते व पाणी पाळ्या द्याव्यात. गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो. आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब (७५ टक्के) ३ ग्रॅम किंवा झायनेब (७५ टक्के) ३ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल १ मिली. एकरी ५०० लिटर पाणी वापरावे. आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी १५ दिवसांनंतर करावी. संपर्कः डॉ. भानुदास गमे, ७५८८०३६३९१ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)