सध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पोषक हवामान मिळाल्यास याची तीव्रता जलद गतीने वाढते. या रोगाने धोक्याची पातळी ओल्याडल्यानंतर रोग नियंत्रणात आणणे अतिशय अवघड ठरते. त्यामुळे रोगप्रसार होण्याआधीच सामूहिकरित्या उपाययोजना कराव्यात. केळीमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडांच्या खालील पानांवर आढळून येतो. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच पानांच्या शिरेस समांतर बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन वाळतात. ठिपक्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. पानांच्या कडांवर आणि शेंड्यावर ठिपके आढळतात. अनुकूल हवामान जास्त काळ राहिल्यास ठिपके एकमेकांत मिसळून पाने टोकाकडून करपतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास संपूर्ण पान सुकते, एकूण कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. याचा विपरीत परिणाम केळीच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो. रोगप्रसार
रोगाच्या वाढीसाठी आर्द्रता हा महत्त्वाचा घटक. पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवामान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी आहेत. बुरशीचे बिजाणू पानाच्या खालील बाजूने पर्णरंधाच्या पेशीतून आत शिरून रोगाचा प्रादुर्भाव करतात. बिजाणूंचा प्रसार पानांवर पडणाऱ्या पाऊस अथवा दवबिंदूद्वारे होतो. पावसाच्या पाण्यामुळे पाने धुतली जात असताना मुख्य झाडाखाली वाढणाऱ्या पिलावर या बुरशीचे बिजाणू पडून त्यांना देखील रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे खोडवा ठेवलेल्या बागेत या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. पोषक तापमान आणि आर्द्रता असेपर्यंत हे बिजाणू रोगनिर्मितीचे कार्य करत असतात. पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे बिजाणू लांब अंतरावर वाहून नेले जातात, त्यामुळे रोगाचा प्रसार जलद गतीने होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरित द्रव्याचा ऱ्हास होऊन पाने करपतात. त्यामुळे झाडांवरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. अन्ननिर्मितीच्या प्रकियेत बाधा निर्माण होऊन पोषणाअभावी फळांची योग्य वाढ होत नाही. परिणामी, फळे आकाराने लहान राहतात, फळात गर भरत नाही, फळांचे वजन आणि दर्जा खालावतो. रोगाची तीव्रता वाढल्यास घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते. शिफारसीपेक्षा कमी अंतरावर केलेली दाट लागवड. अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळी लागवड करणे. बागेत तणांचा प्रादुर्भाव होणे अणि सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव. ठिबक सिंचनाद्वारे होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर. मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढणे. पिकांची फेरपालट न करता सतत केळीचे पीक (एकच एक पीक) घेणे. वर्षभरात केव्हाही लागवड करणे. पील बागेचे अयोग्य व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करणे. एकात्मिक पद्धतीने रोग व्यवस्थापन
रोगग्रस्त पानांचा भाग काढून टाकावा. पानांचा ३० टक्के भाग करपल्यास ते पान काढून जाळून नष्ट करावे. शिफारस केलेल्या १.५ मी. बाय १.५ मी. किंवा १.८ मी. बाय १.८ मी. अंतरावरच लागवड करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल, याची काळजी घ्यावी. बाग कायम वाफसा स्थितीत ठेवावी. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतांना बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार, हंगाम आणि पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन शिफारशीप्रमाणे बागेला पाणी द्यावे. बागेत अतिरिक्त आर्द्रता निर्माण होऊ देऊ नये. बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा वेळापत्रकानुसार द्यावी (प्रतिझाड नत्र २०० ग्रॅम, स्फूरद ६० ग्रॅम आणि पालाश २००). अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा. बागेत कोणतेही पीक अवशेष ठेऊ नयेत. सतत केळी पीक घेणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी. खोडवा घेण्यापूर्वी बागेतील खोडे, पाने काढून बाहेर काढून बाग स्वच्छ करावी. रासायनिक नियंत्रण- (फवारणीः प्रतिलिटर पाणी) प्राथमिक लक्षणे दिसताच,
कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम प्रादुर्भाव जास्त झाल्यास,
स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी करावी. पानांचा वरील व खालील पृष्ठभाग द्रावणाने पूर्णपणे भिजेल याची काळजी घ्यावी. (टीप- वरील शिफारशींना लेबल क्लेम आहे.) संपर्क- ०२५७-२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव)