पुण्यात पाणीवाटपात जिल्हाधिकारी ठेवणार समन्वय

पुण्यात पाणीवाटपात जिल्हाधिकारी ठेवणार समन्वय
पुण्यात पाणीवाटपात जिल्हाधिकारी ठेवणार समन्वय

पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यासह, पुणे जिल्ह्यात शासनाने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे. मात्र, जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी, तर ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेले पाणीवाटपाबाबत जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतली आहे.

चालू वर्षी पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिम पट्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली आहेत. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती तयार झाली आहे.

या परिस्थितीबद्दल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, ‘‘धरणांमध्ये असलेला पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे पाणीवाटपाबाबत समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग, महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. या सर्व विभागाकडून जिल्हा प्रशासनाला रोज पाण्याची स्थिती प्राप्त होत आहे.’’

जिल्ह्याच्या पूर्व पट्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यात ४५ ते ५० टक्केहून कमी पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाला ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास तेथे दुष्काळ जाहीर करावा लागतो. अशा निकषानुसार अहवाल मागविला आहे. धरणसाठा ८० टक्के असून पाणी टंचाई निर्माण होणार नाही. परंतु हे पाणी पुढील मे महिन्यापर्यंत पुरविण्यााठी नियोजनात्मक पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासोबत लवकरच समन्वय साधून बैठक घेण्यात येईल. जुन्नर तालुक्यात यंदा १२७ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसामध्ये सातत्य नसल्याने भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुन्नर तालुका दुष्काळसदृश्य नसला तरी नुकसान झालेल्या पिकांचा अहवाल मागविण्यात आला आहे.

साठ लाख टन चाऱ्यांचे नियोजन जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. कमी पाण्यामुळे अनेक पिकांना फटका बसला असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकर अंतिम अहवाल तयार होईल. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने सुमारे ६० लाख टन चारा उपलब्ध होण्याचे नियोजन केले असून हा चारा पुढील जानेवारीपर्यंत टिकेल. त्यामुळे चारा टंचाई भासणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com