पुणे ः सध्या कोरोना व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याचा परिणाम गावागावांतील अर्थकारणावर होत आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे अर्थकारण असलेल्या आठवडे बाजारावर कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ४०० गावातील बाजाराला फटका बसला आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी ‘कोरोना’चा संसर्ग पुणे, मुंबईपुरता होता. त्यानंतर चिंचवड, नगर, नागपूर या शहरानंतर ‘कोरोना’चे सावट गावागावांत पोहचले आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिक रोजगाराच्या निमित्ताने पुणे, मुंबई येथे आहे. मात्र, या शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे जाऊ लागल्याने जिल्ह्यातील शिरूर, बारामती, खेड तालुक्यातही दक्षता पाळली जात आहे. यामुळे प्रशासनाने गरजेनुसार तपासण्या सुरू केल्या जात आहेत. तरीही ग्रामीण भागात काही प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाल्याने त्याचा परिणाम गावागावांतील अर्थकारणावर होऊ लागला आहे.
तेरा तालुक्यांतील १४०० गावांपैकी सुमारे ४०० गावांत आठवडे बाजार भरत आहे. या प्रत्येक बाजारातून सरासरी चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होत आहे. एका बाजारावर सुमारे १०० ते १५० विक्रेते अवलंबून असतात. एका बाजारात जवळपास ४ ते ५ लाख रुपयांची उलाढाल गृहीत धरल्यास सुमारे ४०० गावांतील बाजाराला चार ते पाच कोटी रुपयांचा फटका एका आठवड्यात बसला असल्याचे दिसून येते. साधारणपणे एका बाजारात परिसरातील सात ते आठ गावांतील ग्राहक खरेदीसाठी येतात. भाजीपाला, धान्य, कटलरी, धान्य आदींची विक्री केली जात आहे. तसेच बहुतांश विक्रेते मालवाहतूक गाडीने बाजारात येतात. त्याचा खर्च निघणेदेखील जिकिरीचे झाले. या विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.
बाजार बंदची शेतकऱ्यांना झळ शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाही या बाजाराशी निगडीत आहे. बाजार बंद असल्याने मालाला त्या तुलनेत ग्राहक नाही. शेतीमालाचेही मोठे नुकसान होत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.