नगर ःपर्जन्यमापक बसवल्याचा खर्च गेला पाण्यात

पर्जन्यमापक संग्रहित छायाचित्र
पर्जन्यमापक संग्रहित छायाचित्र

नगर ः जिल्हा परिषदेतर्फे मार्च २००५ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांत पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, महसूल विभागाकडे हस्तांतर केल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्यापैकी फक्त १६ यंत्रे सध्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे या यंत्रांवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याचेच चित्र आहे. दुसरीकडे पावसाच्या अचूक आकडेवारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अशी यंत्रे बसविली जावीत, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली. महसुली क्षेत्रात झालेल्या पावसाच्या आकडेवारीवरून गावांची पैसेवारी ठरवली जाते. दुष्काळ जाहीर करण्यासाठी किंवा इतर अनेक सरकारी योजनांसाठी ही आकडेवारीच महत्त्वाची ठरत असते. सध्या जिल्ह्यात महसूलनिहाय पावसाची नोंद घेतली जाते. महसूल क्षेत्रात १० ते १५ गावे असतात. पर्जन्यमापक यंत्राशेजारी पडलेला पाऊस सर्व महसुली क्षेत्रासाठी ग्राह्य धरला जातो. मात्र, या प्रकारामुळे अनेकदा गावांवर अन्याय होतो. नुकत्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी हाच मुद्दा उपस्थित करत बंद पर्जन्यमापकाबाबत लघुपाटबंधारे विभागाला धारेवर धरले होते. चौदा वर्षांपूर्वी बसविलेल्या ७७ पर्जन्यमापक यंत्रांकडे लक्ष न दिल्याने त्यापैकी सध्या फक्त १६ यंत्रे सुरू आहेत. ही आकडेवारी सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषदेने स्वभांडवलातून घेतलेल्या या यंत्राचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. हे यंत्र त्या वेळी ६,१९० रुपयांना घेण्यात आले होते. आता त्याची किंमत साडेआठ हजारांपर्यंत गेली आहे. जिल्ह्यातील १,३१३ गावांत ही यंत्रे बसविण्याबाबत सभेत चर्चा झाली होती. त्यासाठी किती निधी लागेल, कसे नियोजन करावे लागेल, यावर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, संदेश कार्ले आदींनी या विषयावर चर्चा केली. अचूक पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे या वेळी ठरले. देखभाल करणे महत्त्वाचे जिल्हा परिषदेने १४ वर्षांपूर्वी बसविलेली पर्जन्यमापक यंत्रे सरकारी इमारतीच्या आवारात बसविण्यात आली होती. काचेचे भांडे आणि पत्र्याचा डबा अशा पद्धतीने असलेल्या या यंत्राला आडोसा करणे महत्त्वाचे असते; अन्यथा ते चोरीला जाण्याची भीती असते. भविष्यात जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात यंत्रे बसविण्याचा उपक्रम राबविला, तर त्याची देखभाल दुरुस्ती स्थानिक महसूल यंत्रणेच्या जबाबदार व्यक्तीकडे देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com