पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटका

पूर्वहंगामी कापूस पिकाला कमी पर्जन्यमान आवश्‍यक असते. काळ्या कसदार किंवा कुठल्याही क्षेत्रात अधिक पाऊस झाला तर बोंडे, कैऱ्यांचे नुकसान होते. यंदा असे नुकसान अधिक दिसत आहे. तसेच कैऱ्याही कमी लगडत आहेत. - दीपक पाटील, कापूस उत्पादक, माचले (जि. जळगाव)
कापूस पीक
कापूस पीक

जळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा पाऊस आणि प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला असून, बोंडे काळवंडली आहेत. उत्पादनात आजघडीला १५ ते २० टक्के घट मानली जात आहे.   पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व धुळे, नंदुरबारमधील शहादा व तळोदा आणि जळगावमधील तापी काठावरील यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, गिरणाकाठावरील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि वाघूरच्या क्षेत्रातील जामनेर तालुका प्रसिद्ध आहे. यंदा खानदेशात मिळून सुमारे दीड लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली आहे. सर्वाधिक सुमारे ८० हजार हेक्‍टर लागवड जळगाव जिल्ह्यात आहे.  तापी, गिरणा, पांझरा, गोमाई, सुसरी नदीकाठच्या भागातील काळ्या कसदार जमिनीत पीक जोमात होते. परंतु शहादा, तळोदा, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, जामनेर आदी भागांत सततचा पाऊस व कोरड्या वातावरणाचा अभाव यामुळे पिकातील बोंडे काळवंडली आहेत. काही शेतांमध्ये सखल भागात सतत पाणी राहिल्याने मूळकूजचा प्रकार दिसत आहे. अशा क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. तर बोंडे काळवंडल्याने १५ ते २० टक्के नुकसान गृहीत धरले जात आहे. या महिन्यात कमी पाऊसमान व अधिक दिवस कोरडे वातावरण राहिले असते, तर दिवाळीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकात वेचणी झाली असती. तसेच बोंडेही फारशी काळवंडली नसती. अतिपाऊस किंवा प्रतिकूल वातावरणामुळे कुठेही ५० टक्‍क्‍यांवर नुकसान झालेले नसले तरी, पहिल्या वेचणीवर पाणी फिरणार असून, हंगाम लांबणीवर पडेल, अशी स्थिती आहे. कारण नवे पाते, फुले व कैऱ्या तयार होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागतो. यानंतर बोंडे तयार होतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच यंदा कैऱ्या तयार होण्याचे प्रमाण हलक्‍या व काळ्या कसदार जमिनीत कमीच असून, हंगाम फारसा जोमात नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  प्रतिक्रिया धुळ्यातील शिरपूर व काळी कसदार जमीन असलेल्या भागातील पूर्वहंगामी कापूस पिकात सततच्या पावसाने बोंडे काळवंडली आहेत. आमच्याकडे तर मागील २८ दिवस पाऊस आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नाही. यामुळे ही समस्या दिसत आहे. १५ टक्‍क्‍यांवर नुकसान आहे. त्यासंबंधी नेमके सर्वेक्षण झालेले नसल्याने आकडेवारी स्पष्टपणे सांगता येणार नाही. - डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com