पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !

यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या मशागतीत व सोईत कमी पडलो नाही. पण सतत पडणाऱ्या पावसाने कपाशीला चांगली बोंड फुटलीच नाही.
crop damage
crop damage

औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या मशागतीत व सोईत कमी पडलो नाही. पण सतत पडणाऱ्या पावसाने कपाशीला चांगली बोंड फुटलीच नाही. एक ना दोन वेचणीतच कापसाचा खेळ खल्लास होतोय. एकरी जिथं दहा-बारा क्विंटल होईल वाटलं तिथं तीन चार क्विंटल कापूस होतोय का नाही देव जाणे. कुटुंबात जवळपास सोळा एकर कपाशीचे क्षेत्र असलेल्या खादगाव (ता. पैठण) येथील युवा शेतकरी चैतन्य कोल्हे सततच्या पावसाने शेतीच्या अर्थकारणाच्या कोलमडलेल्या अवस्थेची मांडणी करत होते. चैतन्य म्हणाले, की पोळ्यानंतर पाऊस दम खाईल असं वाटलं, पण पोळ्यानंतरच पावसाने दणका दिला. जुनेजाणते लोक असं कधी झालं नव्हतं, असं सांगतात. खर्चाचं गणित पाहिले तर कपाशीचे पीक उत्पादन खर्च काढून देईल असं वाटत नाही. वेचणीला प्रतिकिलो १२ ते १३ रुपये मोजावे लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने माझाच काय अनेक शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे. तो पाण्यात भिजल्याने चार हजार पुढे दर मिळत नाही. सारं अवघड आहे. पण परवडत नाही म्हणून फुटलेला, भिजलेली कापूस शेतात ठेवताही येत नाही. तीस किलोमीटर वरून गाडी भाडे दररोज दीड हजार खर्च करून मजूर आणले. आधी पाऊस उघडल्यानंतर थोडा सुकला की कापूस वेचून म्हणून ठेवला त्यात पुन्हा पावसाने खोडा घातला, पावसानं वैतागून सोडलंय. शेत शेवाळली एवढा पाऊस झालाय. सारी शेती यंदा तोट्यातच आहे. शेकटा (ता. गंगापूर) येथील कयूम शेख म्हणाले, की पाच एकरात मुगाची पेरणी केली. पण सततच्या पावसाने मूग काळे पडले. दरवाढीच्या आशेने ते घरी ठेवले. पण दर काही वाढेना. आता महिनाभरापासून लासूरच्या बाजारात विक्रीसाठी दिले तर त्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढे कोणी विचारेना. वीस हजार रुपये मुगा साठी खर्च झाला अन हाती ४००० येतात की नाही सांगता येत नाही. आले पिकात अजूनही पाणी खेळतय, कपाशीची तर पुरती वाट लागली. यंदा पावसाने जरा खेळ मांडलाय सरकारनं आमच्या अवघड परिस्थितीचा विचार करून मदतीचा हात द्यावा.

प्रतिक्रिया पाच एकर कपाशीतून आठ ते नऊ क्विंटल दर्जा घसरलेला कापूस हाती आला. त्याला बाजारात साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल पुढे कोणी विचारेना. ५५ हजार कपाशीवर खर्च झाला. तुरीचा पहिला बहारही गळून पडला. - भरत गीते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करण म्हणजे जुगार खेळल्यागत झालं. एखाद्यावर्षी डाव जिंकला की ४ ते ५ वर्ष धोका झाल्या शिवाय राहत नाही. मजुरांना जवळपास उत्पन्नाच्या अर्धी मजुरी द्यावी लागते. मशागत, बियाणे, खते, फवारणी असे मिळून काही शिल्लक राहत नाही. यंदा पावसानं व्हत्याच नव्हतं केलं. अजून महिनाभर वापसा येणार नाय अशी स्थिती आहे. - सुमंत कडेठाणकर,  कडेठाण ता. पैठण जि औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com