राज्यात १२१ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ ः देशमुख

 कापूस
कापूस

मुंबई : राज्यात कापूस हंगाम २०१७-२०१८ मध्ये कापसाचे दर हमीभावाच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यात कापूस हमीभावाने खरेदीसाठी केंद्र शासनाचे नोडल एजंट ‘सीसीआय’ आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २५) दिली. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी महासंघ, नाफेड, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कापूस विक्रीस आणताना प्रत्येकवेळी सातबारा उतारा, आधार कार्ड व इतर कागदपत्रे आणण्याचा त्रास होऊ नये. तसेच चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर १८ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू केली आहे. राज्यात कापूस पणन महासंघाव्दारे ६० केंद्रे व केंद्र शासनाचे नोडल एजंट सीसीआयव्दारे ६१ अशा १२१ केंद्रांवर हमी दरावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ‍बुधवार (ता. २५) पासून महासंघाव्दारे ३९ कापूस खरेदी केंद्रांवर खरेदीला सुरवात करण्यात आलेली असून, उर्वरित २१ केंद्रांवर २६ ऑक्टोबरनंतर सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी आणि एफएक्यू प्रतीचा कापूस महासंघाकडे हमी दरावर विक्रीसाठी आणावा. तसेच याबाबत काही अडचण असल्यास त्याची तक्रार कापूस पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे करावी, असे आवाहनही मंत्री देशमुख यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com