औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील सीसीआय व ‘पणन’च्या ८ केंद्रांवरून कापसाच्या खरेदीला सुरवात झाली. जालना जिल्ह्यातील एका खरेदी केंद्रावरून उद्यापासून खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यातील कापूस उत्पादकांकडे जवळपास ३० टक्के क्षेत्रावरील उत्पादित कापूस विक्री विना घरीच पडून असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या खरेदी प्रक्रियेमुळे खरेदी केंद्र पुन्हा कधी सुरू होतील, याविषयी प्रश्नचिन्ह होते. अखेर काही खरेदी केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेला कापूस खरेदी केला जाईल, अशी आशा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, बालानगर, तुर्काबाद येथे कापसाची खरेदी सुरू झाली. जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, मंठा येथील खरेदी केंद्र सुरू झाले. परतूर येथे बुधवारपासून (ता. २८) कापसाची खरेदी सुरू होईल. बीड जिल्ह्यातील गेवराई येथेही कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे, असे पणन व सहकाराच्या सूत्रांनी सांगितले. जालना जिल्ह्यात विविध केंद्रावर ३६ हजार १२३ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. त्यात जालना तालुक्यातील १२५६७, अंबड-घनसावंगी तालुक्यात ८ हजार ४९१, भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील ४ हजार ६५८, मंठा तालुक्यातील ५०१८, परतूर-आष्टी तालुक्यातील ५ हजार ३८९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जालन्यात १० लाख क्विंटलवर कापूस शिल्लक
जालना जिल्ह्यातील केंद्रांतर्गत जवळपास १० लाख ३९ हजार ९१४ क्विंटल कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याची नोंदणीतून समोर आले आहे. त्यामध्ये जालना तालुक्यातील ४२२९१७ क्विंटल, अंबड-घनसावंगी तालुक्यात १ लाख ९४ हजार क्विंटल, भोकरदन-जाफराबाद तालुक्यात १५३२५१ क्विंटल, मंठा तालुक्यात १ लाख ४९ हजार ८६४ क्विंटल, तर परतूर-आष्टी तालुक्यात शिल्लक असलेल्या ११९२८३ क्विंटल कापसाचा समावेश असल्याचे नोंदणीतून समोर आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.