बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या दरात सुधारणा

मागील दोन तीन वर्षांमध्ये नव्हती, एवढी कापूसटंचाई सध्या राज्यातील जिनिंग कारखान्यांसमोर आहे. उत्तरेकडे स्थिती चांगली आहे. तेथे कापसाली लागवड कमी असताना आवक मात्र चांगली आहे. मध्य भारतात किंवा मध्यांचलमध्ये सर्वाधिक कापूस लागवड, पण आवक अतिशय कमी आहे. कोरडवाहू कापसाचे पीक उद्‌ध्वस्त झाल्याने ही स्थिती आहे. कापूस उत्पादनात मोठी घट होईल. सर्व ताळेबंद यंदाही चुकतील. - अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
कापूस
कापूस

जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्‍टर लागवड करणाऱ्या महाराष्ट्रात मोठी कापूसटंचाई यंदा आहे. कोरडवाहू कापूस उद्‌ध्वस्त झाल्याने पुढेही फारशी आवक राहणार नाही. तर सर्वात कमी कापूस लागवड करणाऱ्या उत्तरेकडील राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात मिळून प्रतिदिन ४० हजार गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक होत आहे. कापूसटंचाईमुळे दरवाढ झाली असून, मागील १० ते १२ दिवसांत कापसाचे दर क्विंटलमागे ८०० रुपयांनी वधारले आहेत.  राज्यातील जिनिंग २० टक्के क्षमतेनेही कार्यरत नसून, रोज फक्त पाच हजार गाठींचे उत्पादन होत आहे. कापूस आवकच नसल्याने ही अडचण आहे.  देशात यंदा १२० लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली आहे. उत्तर भारतात मिळून सुमारे १२ लाख हेक्‍टरपर्यंत लागवड झाली आहे. परंतु मध्य भारतासह दक्षिणेतील राज्यांमध्ये ऐन सप्टेंबरमध्ये पाऊस नव्हता. कोरडवाहू कापूस या भागात सर्वाधिक आहे. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये कोरडवाहू कापूस उद्‌ध्वस्त झाल्यात जमा आहे. मध्य भारतात ७० टक्के कापसाचे पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे. तर राजस्थान, पंजाब, हरियाणात कापसाखील कमाल क्षेत्र ओलिताखाली आहे. तेथे पीक चांगले आहे. यामुळे आवकही जोमात आहे.  उत्तर भारतात जानेवारीपर्यंत वेचण्या आटोपून क्षेत्र रिकामे व्हायला सुरवात होईल. पण मध्य भारतात कोरडवाहू कापसात फक्त फक्त दोन वेचण्या होतील.  उत्पादन ३५ ते ४० टक्के घटेल. कारण पुढे पावसाचे फारसे संकेत नाहीत. जेवढे दिवस पाऊस लांबला, तेवढा फटका बसत आहे. यामुळे कापूस उत्पादनाचा ताळेबंद बिघडेल. देशात ३६५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज सुरवातीला होता, पण हा अंदाज चुकून उत्पादन ३४० ते ३४२ लाख गाठींपर्यंतच येईल, असे स्पष्ट मत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अनिल सोमाणी यांनी व्यक्त केले आहे. 

गुजराततेत स्थिती बरी गुजरातमधील जुनागड, राजकोट (सौराष्ट्र), मध्य गुजरातेत कापसाचे पीक चांगले आहे. पूर्वहंगामी कापूस या भागात अधिक आहे. गुजरातेत २६ लाख हेक्‍टरपैकी ६५ ते ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली असल्याने उत्पादन चांगले येईल. 

कापसाची दरवाढ कापूसटंचाईमुळे मध्य भारतात कापसाचे दर मागील १० ते १२ दिवसात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांनी वधारून ५८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. राज्यात ८ ते १० दिवसांपूर्वी २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापसाला ५००० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते.  सुरवातीचा साठा सर्वांत कमी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, देशात सुरवातीचा कापूस साठा (ओपनींग स्टॉक) फक्त १५ लाख गाठी आहे. देशात सूतगिरण्यांना प्रतिदिन एक लाख गाठींची आवश्‍यकता आहे. नव्या हंगामात कापसाची आवक अडखळत सुरू आहे. सर्वाधिक सूतगिरण्या दाक्षिणात्य भागात आहेत. पण याच भागात कापसाची लागवड कमी आहे. शिवाय पीक पावसाअभावी संकटात आहे. यामुळे या भागातील गिरण्यांसमोर पुढे रुईच्या टंचाईचे संकट आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com