कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सुध्दा बाजाराचा अंदाज वर्तवणे कठीण होत आहे. २०१९ मध्ये कापूस, रूई, सूत आणि कापड यांच्या बाजारात एवढ्या उलथापालथी झाल्या की अनुभवी विश्लेषक आणि व्यापाऱ्यांनाही चकवा खावा लागला. २०१८-१९ मध्ये कापसाच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे कापसाच्या दरात तेजी येण्याचा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र तेजीऐवजी मंदीचा सामना करावा लागला. या मंदीचा मोठा फटका व्यापारी, जिनर्स, सूतमिल आणि शेतकऱ्यांना बसला. २०१९-२० या हंगामात कापूस लागवडीचे वाढलेले प्रमाण आणि सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे कापूस उत्पादन ४०० लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु पूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापूस उत्पादनाचा अंदाज आता ३५५ ते ३६० लाख गाठींवर आला आहे. कापसाची गुणवत्ता आणि गुजरातमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढचं चित्र काय असेल याबद्दल चिंता वाढली आहे.
कॉटन ॲडव्हायजरी बोर्डाने(सीएबी) २८ नोव्हेंबर रोजी कापूस उत्पादन आणि खप याविषयीचा अहवाल जाहीर केला. त्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
कापसाच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सगळं काही आलबेल आहे, असं हा अहवाल बघितला तर वाटतं. परंतु जमिनीवरचं वास्तव मात्र वेगळं आहे. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, अवकाळी पाऊस आणि मागणीत झालेली घट यामुळे कापूस, रूई, सूत आणि कापड बाजाराची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे.
‘कॉटनगुरू’ला आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत :
या सगळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था सर्वाधिक नाजूक आहे. कापसाला प्रति क्विंटल ५५०० रुपये किमान आधारभूत जाहीर करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत खासगी खरेदीदार प्रति क्विंटल २५०० ते ५२०० रुपये या दरम्यान दर देत आहेत. हमीभावाने सरकारी खरेदीचे घोडे फारसे पुढे सरकलेले नाही. गेल्या दोन महिन्यांत ‘सीसीआय''ने केवळ १ टक्का कापूस खरेदी केला आहे. शेतकऱ्याला कापसाचा उत्पादनखर्च भरून निघणेही मुश्किल झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘कॉटनगुरू''ने १५ नोव्हेंबर, २०१९ रोजी औरंगाबाद येथे १३ फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची (एफपीसी) बैठक घेऊन कापसाची मार्केटिंग आणि बाजाराचा कल या विषयावर मार्गदर्शन केले. आजघडीला शेतकऱ्यांसाठी सीसीय हाच प्राथमिक खरेदीदार असणार आहे; त्यामुळे ‘सीसीआय''च्या अटी आणि शर्तींप्रमाणेच कापूस विक्री करावी लागणार आहे, असे या वेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. कापसाचा दुसरा मोठा खरेदीदार म्हणजे जिनर्स. चांगल्या गुणवत्तेच्या मालाला जिनर्सकडून अधिक भाव मिळतो. ‘कॉटनगुरू''ने या बैठकीसाठी ‘सीसीआय''चे पदाधिकारी आणि देशातील बडे जिनर्स यांना आमंत्रित केले होते. त्यांचे मागर्दर्शन उपयुक्त ठरले. तसेच एफपीसी प्रतिनिधींची जिनर्ससोबत थेट कापूस विक्रीबाबतही चर्चा झाली.
(लेखक कापूस बाजार विश्लेषक व ‘कॉटनगुरू'चे प्रमुख आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.