देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर येणार 

देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र आधीच्या अंदाजापेक्षा १.५० लाख गाठींनी उत्पादन कमी होईल. नव्या अंदाजानुसार देशांतर्गत कापूस उत्पादन ३५८.५० लाख गाठींवर राहील.
cotton
cotton

नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र आधीच्या अंदाजापेक्षा १.५० लाख गाठींनी उत्पादन कमी होईल. नव्या अंदाजानुसार देशांतर्गत कापूस उत्पादन ३५८.५० लाख गाठींवर राहील. तसेच महाराष्ट्रातील कापूस उत्पादनही ५ लाख गाठींनी घटले आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) मार्च महिन्यातील अहवालात नमूद केले आहे. 

‘सीएआय’ने यंदाच्या ऑक्टोबर २०२० पासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात बाजारात ४३०.८९ लाख गाठींची आवक झाल्याचे ‘सीएआय’ने म्हटले आहे. यात नवीन कापसाच्या २९८.८९ लाख गाठींसहित ७ लाख आयात गाठी आणि १२५ लाख जुन्या गाठींचा समावेश आहे. तसेच या कालावधीत बाजारात एकूण १३७.५० लाख गाठींचा वापर झाल्याचेही जाहीर केलेल्या अंदाजात नमूद केले आहे. तर फेब्रुवारीअखेर पर्यंत ३६ लाख कापूस गाठींची निर्यात झाल्याची माहितीही ‘सीएआय’ने दिली आहे. 

ही परिस्थिती लक्षात घेता फेब्रुवारीच्या शेवटी बाजारात २५७.३९ लाख गाठी शिल्लक असू शकतात. त्यातील ९२.५० लाख गाठी कापड गिरण्यांकडे, तर उर्वरित १६४.८९ लाख गाठी भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआय, महाराष्ट्र फेडरेशन आणि इतर संघटनांकडे असल्याचे हा अंदाज सांगतो. त्यात बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापारी, जिनर्स, एमसीएक्स आदींचा समावेश होतो. 

कापसाचा हा हंगाम ३० सप्टेंबरला समाप्त होईल. तोपर्यंत बाजारात ४९५.५० लाख कापूस गाठींचा पुरवठा होईल. एकूण कापूस पुरवठ्यात १२५ लाख जुन्या गाठी, यंदाच्या पिकातून मिळालेल्या ३५८.५० लाख गाठी आणि आयात केलेल्या १२ लाख गाठींचा समावेश असेल. या उलट गेल्या वर्षी १५.५० लाख कापूस गाठींची आयात झाल्याचा अंदाज आहे. 

६० लाख गाठी निर्यातीचा अंदाज  देशात ३३० लाख कापूस गाठींची गरज भासेल असा अंदाज ‘सीएआय’ने कोरोना संकट काळात लागलेल्या टाळेबंदीपूर्वी वर्तवला होता. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर चालू हंगामात भारतातून ६० लाख कापूस गाठींच्या निर्यातीचा अंदाज आहे. गेल्या महिन्यात हाच आकडा ५४ लाख गाठींचा होता. त्यामुळे निर्यातीत वाढ होणार असल्याचे दिसते. गेल्या वर्षी ५० लाख गाठी कापसाची निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात १०७.५० लाख गाठी कापूस शिल्लक राहू शकतो.  राज्यनिहाय उत्पादनातील वाढ, घट  गुजरात ः ३ लाख गाठींची वाढ  हरियाना ः १.५० लाख गाठी वाढ  उ. राजस्थान ः २ लाख गाठींची वाढ  द. राजस्थान ः १.५० लाख गाठींची घट  महाराष्ट्र ः ५ लाख गाठींची घट 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com