निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन कारवाई 

खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने यंदा शेकडोंच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या. याबाबत गुणवत्ता नियंत्रण विभागाने बियाण्याचे नमुने घेतले.
soybean
soybean

अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने यंदा शेकडोंच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या. याबाबत गुणवत्ता नियंत्रण विभागाने बियाण्याचे नमुने घेतले. आता कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन कारवाई सुरु केली आहे. यामध्ये विक्रेत्यांची नावे जोडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. विक्रेत्यांनी ‘आमची चूक काय?’ अशा आशयाचे पत्र काढत या कारवाईचा निषेध केला आहे. शिवाय जिल्हाधिकारी, कृषी विभागाला निवेदन देत गुरुवारी (ता.२९) बियाणे विक्रीचे परवाने परत करण्याचा इशारासुद्धा दिला आहे. 

अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले की, कृषी अधीक्षकांच्या अधीन असलेल्या बियाणे परवान्याअंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांचे सीलबंद प्रमाणित बियाण्यांची विक्री केली जाते. यंदाच्या सोयाबीन उगवण तक्रारीअंतर्गत विक्रेत्यांनी दोन वेळा खुलासे दिल्यानंतरही त्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. न्यायालयीन कारवाई करण्यापूर्वी संबंधितांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. शुक्रवारी (ता.23) संघटनेचे पदाधिकारी जिल्हा अधीक्षकांना भेटले असता त्यांनी वरून प्रेशर असल्याने कारवाई होणारच असल्याचे सांगितले. विभागाकडून वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे व खुलासा देऊनही समाधान होत नसल्यामुळे सर्व सभासदांच्या एकमताने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व विक्रेते आपले बियाणे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना परत देऊन विक्री बंद केली जाईल, असे म्हटले आहे. 

या प्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने सोमवारी (ता.26) जिल्हा अधीक्षकांनी विक्रेत्यांसोबत पुन्हा चर्चा सुद्धा केली. आपण विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले.  बियाण्याबाबत शेकडो तक्रारी  हंगामात काही बियाणे कंपन्यांनी निकृष्ट बियाणे पुरविल्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. याबाबत जिल्हयात सुमारे सहाशेपेक्षा अधिक तक्रारी असल्याचे समजते. आता कृषी खात्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन लढा सुरु केला असून शासनाच्या बियाणे कंपनी कायद्याविरुद्ध केसेस दाखल केल्या आहेत. या कारवाईच्या अनुषंगाने संबंधित बियाणे विक्रेत्याचे नाव केसमध्ये आल्याने याला विक्रेत्यांकडून विरोध होत आहे. आमची चूक नसल्याचा दावा विक्रेते करीत आहेत. 

प्रतिक्रिया आपण गुणवत्ता नियंत्रणासाठी दरवर्षी कारवाई करीत असतो. आपण ज्यावेळी एखाद्या कंपनीविरुद्ध कारवाई करतो त्यावेळी संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी लागते. यंदाच्या कारवाईबाबत कृषी विक्रेत्यांचे काही बाबींवर आक्षेप आहेत. परंतु ही कारवाई काही पहिल्यांदाच झालेली नाही. त्यामुळे मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करू नये याबाबत विनंती केली आहे.  -उदयकुमार नलवडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com