नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्याचा घोळ कायम

मंजूर (ता.कोपरगाव) येथे बंधाऱ्यापासून नदी पडल्याने जमिनीचे नुकसान झाले असून त्या जमिनी मुळापासून नष्ट झाल्या आहेत. याबाबत मी तिथे जाऊन स्वतः माहिती घेतली. नुकसानीच्या पिकाचे पंचनामे झाले असून नष्ट झालेल्या जमिनीचे ही लवकरच पंचनामे करणार आहोत. - अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव जि. नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचा घोळ कायम आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकऱ्यांसह जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. वाहून गेलेल्या जमिनीची माती नेमकी किती असेल याचा महसूल प्रशासनाला अंदाज येत नसल्याने आता यासाठी पाटबंधारे विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंजूर येथे वाहून गेलेल्या जमिनीबाबत तेथील शेतकऱ्यांची भेट घेऊन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी माहिती घेतली.

नगर जिल्ह्यामध्ये अजूनही जोरदार पाऊस नाही मात्र नाशिक आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सहन नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हाभरातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची साधारण ४५ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले असले तरी पाण्यामुळे जमीन वाहून कायम नष्ट झालेल्या मात्र पंचनामे कसे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक भिंत न बांधल्यामुळे प्रवाह बदलला आणि साधारण १५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. अजूनही जमीन वाहून जातच आहे. भीमा, गोदावरी नदीकाठी जे नुकसान झाले त्याचे पंचनामे शासनाकडून करण्यात आले असले तरी, जमीन वाहून नष्ट झालेल्या भागाचे पंचनामे कसे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे. आणि त्यातच पंचनाम्यांचा घोळ अजून कायम आहे.

पुराच्या पाण्याने साधारण चार फुटापर्यंत जमीन वाहून गेल्यास त्याचे पंचनामे आणि महसूल प्रशासन करत असते. मात्र, पुराच्या पाण्याने काय नष्ट झाल्याने त्यातील किती माती वाहून गेली आणि अंदाजे किती नुकसान झाले याचा अंदाज महसूल आणि कृषी प्रशासनाला येत नसल्यामुळे त्यासाठी आता लघुपाटबंधारे विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जमिनी नष्ट झाल्यामुळे मंजूर गावासह अनेक भागांतील नुकसान झालेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन मदत कधी मिळणार असा प्रश्न आता या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

देखभालीची जबाबदारी कोणाची? १९९९ ते २००० मध्ये मंजूर तालुका कोपरगाव येथे गोदावरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे काम संजीवनी सहकारी साखर कारखान्याने केले. नंतर हा बंधारा कारखान्याने पाटबंधारे विभागाकडे वर्ग केले ते सांगितले जात आहे. मात्र, त्याबाबत अजून अधिकृत कोणीही बोलत नाही. जर हा बंधारा पाटबंधारे विभागाकडे वर्ग केलेला असेल तर त्याची देखभाल आणि दुरुस्ती जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. दोन वेळा बंधारा फुटूनही याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही आणि त्याचा गंभीर परिणाम म्हणून या वेळी दुसऱ्यांदा फुटलेल्या बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. असे असताना त्याची नेमकी जबाबदारी कुणाची हे मात्र अजूनही सांगितले जात नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणावर टाकणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com