पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकट

पांगरी, जि. सोलापूर ः काढणीला आलेली सोयाबीन पिके तर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यांच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडल्याची विदारक स्थिती आहे.
 Crisis on crops in Pangri area
Crisis on crops in Pangri area

पांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याची स्थिती आहे. काढणीला आलेली सोयाबीन पिके तर अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. त्यांच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडल्याची विदारक स्थिती आहे. दरम्यान, या भागात कांदा पिकाची ही मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मात्र पावसामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 

यंदा जूनमध्येच समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरिपतील सोयाबीन, उडीद, मूग, कांदा,भाजीपाला आदी पिकांची पेरणी लवकरच करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर अधूनमधून होणाऱ्या पावसावर खरिप पिके जोमात आली. आता गेल्या आठ दिवसांपासूनच्या पावसाने सर्वत्र दलदल होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची स्थिती आहे. 

यंदा पांगरीसह चिंचोली, पांढरी, उक्कडगाव, घोळवेवाडी, शिराळे, गोरमाळे, ममदापूर, जहानपूर, घारी, पूरी, ढेंबरेवाडी, खामगांव आदी भागात पेरण्या लवकर झाल्या. पिकेही जोमात आली. मात्र, आता होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सुर्यप्रकाश नसल्याने शेतातील सर्व कामे ठप्प आहेत. पुरेसे कांदा रोप नसल्यामुळे अनेकांनी पेरणी केली. मूग, मका पिकांनाही अतिपावसामुळे मोठ दणका बसला आहे. 

शेतकऱ्यांकडून पंचनाम्यांची मागणी

या खरिप हंगामातील पिकांचा पिकविमा अनेक शेतकऱ्यांनी भरला आहे. आता कृषी विभागासह विमा कंपनीने तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन पिकाचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले आहे. आणखीन पाऊस झाला, तर हातात काहीही राहणार नाही. विमा कंपनीने शंभर टक्के विमा मंजूर करावा. - दिपक मुळे, शेतकरी, उक्कडगाव

पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर पंचनामे करण्यात येतील. - विलास मिस्कीन, कृषी पर्यवेक्षक, पांगरी

रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष नदीकाठच्या गावांतील शेतांत भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. - विनोद मुंढे, तलाठी, पांढरी सजा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com