जुन्नरच्या द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट

जुन्नरच्या द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट
जुन्नरच्या द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट

जुन्नर : सततचा पाऊस, धुके व ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.

बिडवई म्हणाले, ‘‘या प्रतिकूल हवामानामुळे फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांचे सुमारे ऐशी टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.  प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने बुरशीनाशक फवारणीच्या खर्चाला सुमार राहिला नाही, तर फवारण्या करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घडकुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर ५० टक्के नुकसान तत्काळ स्वरूपात झाले आहे. आठ दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान वाढण्याची भीती आहे.’’ 

‘‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफूट, डिपिंग या अवस्थेत आहेत. काही बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही बागा पोंगावस्थेत आहेत. काही बागा फेलफूट ते कळीच्या अवस्थेत आहेत. सर्व अवस्थांना हवामानाचा धोका आहे,’’असेही त्यांनी सांगितले. 

साधारणत: १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. द्राक्ष पिकाच्या झालेल्या व होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल शेतकरी करत असून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

बिडवई म्हणाले, ‘‘ज्या बागा पाच- सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत छाटल्या. त्या फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यात घडकूज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे २० टक्क्यांपासून ते ४० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. पुढेही पाऊस सांगितला असल्याने नुकसानीची तीव्रता वाढेल. या बागांचा माल जानेवारी ते फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांना मोठ्या उत्पादन घटीला सामोरे जावे लागेल.’’ 

ज्या बागांची वेळेवर छाटणी झाली. ज्या बागा पोंगा किंवा फुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यात डाऊनी रोगाचा मोठा धोका तयार झाला आहे. सद्य:स्थितीत या बागा वाचवणेदेखील आव्हानाचे होऊन बसले आहे. शरद सीडलेस , जंबो या वाणांना मागील वर्षीच माल कमी होता. याचे कारण म्हणजे एप्रिलमध्ये त्यांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. 

घड जिरण्याची समस्या सतत पाऊस पडत राहिल्याने ज्या बागा पोंगा अवस्थेत आहेत त्यांच्यातही घड जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे प्रमाण अजून वाढू शकते. सध्या रोगांपासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा ३० ते ४० टक्के खर्च केवळ बुरशीनाशकांवर होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेल्या भरमसाट खर्चातून शेतकऱ्यांच्या हाती  काय लागणार, हा प्रश्‍न ‍आहे.

असे झाले नुकसान...

  •  आगाप द्राक्षांचे ३० ते ८० टक्के          नुकसान
  •  फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना फटका
  •  घडांतील मणी पावसाने फुटले 
  •  मणी, घडांवर डाऊनीचा प्रादुर्भाव
  •   फवारण्या करूनही उपयोग होईना
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com