सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया जाण्याचे संकट

सांगली: अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या मनमानीपणामुळेउर्वरित क्षेत्रातील पेरणी थांबली आहे, तर आगाप पेरणी वाया जाण्याची, तसेच दुबार पेरणीची धास्ती आहे.
 Crisis of wasted sowing in Sangli district due to lack of rains
Crisis of wasted sowing in Sangli district due to lack of rains

सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे खरिपाचा आगाप पेरा वाया जाण्याचे संकट आहे. आता जुलैचा आठवडा संपतो आहे. अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या मनमानीपणामुळे  उर्वरित क्षेत्रातील पेरणी थांबली आहे, तर आगाप पेरणी वाया जाण्याची, तसेच दुबार पेरणीची धास्ती आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी साधारणपणे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, आजअखेर ७५ टक्क्यांच्या घरात कशीबशी पेरणी झाली आहे. जवळपास एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे आगमन लांबले आहे. मात्र, चांगल्या पावसाचे वर्तवलेले  अंदाज, यांमुळे शेतकऱ्यांसह अवघ्या समाजमनाला पावसाच्या आगमनाची  प्रतीक्षा होती. मात्र, आजअखेर दमदार  पावसाने हजेरी लावलीच नाही.

जून संपला तरी अद्याप पावसाची समाधानकारक हजेरी  लागलेली नाही. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी पेरा झालेले क्षेत्र धोक्यात आले आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या,‍ तिसऱ्या आठवड्यात पेरणी बऱ्यापैकी होते. जिल्ह्यात सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग आदी पिकांची आतापर्यंत जेमतेम पेरणी झाली आहे. शिराळा तालुक्यात मात्र भाताची धूळवाफ पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. प्रामुख्याने शिराळा तालुक्यात या वेळी भाताचे क्षेत्र वाढले आहे. पावसाने जरी विलंब केला असला, तरी या तालुक्यात भाताची लावणी पूर्ण झाली आहे. वाळवा, पलूस तालुक्यांसह मिरज पश्चिम भागात केवळ सोयाबीन टोकणीचे धाडस काही शेतकरी करू लागले आहेत.

दुष्काळी भागात खरीप लांबण्याची शक्यता

कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर तालुक्यांतील शेतकरी मात्र शेतीमशागती करून पेरणीसाठी सज्ज आहेत. मात्र, पावसाने जोर धरला नसल्याने पेरणीस गती नाही. कापूस पिकाचे क्षेत्र आटपाडी तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यात घटले  आहे. आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही, तर केलेला पेरा वाया जाईल. शिवाय खरीप हंगामच लांबण्याची  भीती  आहे. सध्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाविना शेतकरी चिंतातुर

अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. आता खरीप हंगाम लांबल्यातच जमा आहे. एकीकडे उन्हाळी पाऊस दमदार झाल्याने शेतकरी आनंदी होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर आहे. जून संपला तरी देखील बहुतांशी क्षेत्रातील पावसाअभावी पेरणी खोळंबली होती. मात्र, आता शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या हंगामात पावसाने दडी मारल्याने खरिपाचे नुकसान झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com