राज्यात अवकाळी, गारपिटीचा पिकांना तडाखा

rain
rain

पुणे ः वाशिम, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नगर, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांत शनिवारी (ता. २९) सायंकाळी आणि रविवारी (ता. १) पहाटे वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, मक्यासह कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात अनेक भागांत सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असून, काढणीला आलेल्या द्राक्षांसह डाळिंब आणि आंबा मोहरालाही वादळी पाऊस आणि गारपिटीने फटका बसला.  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी, बाभूळवाडी, जळगाव खुर्द, जळगाव बुद्रुक, पिंपरखेड, परधाडी, चांदोरे, कासारी, नस्तनपूरच्या शिवारात वादळी पाऊस आणि गारपिटीने काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पिंपरखेड परिसरात गारांच्या तडाख्यामुळे काढणीस आलेल्या मोसंबी व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणावर माल खराब झाला आहे. तसेच कांदा, गहू, हरभरा पिकांचेही नुकसान झाले. गहू वादळी वाऱ्यामुळे शेतातच आडवा झाला, तर अनेक भागांत गहू भिजला. जळगाव खुर्द येथेही गहू, हरभरा आदी पिके आडवी झाली. सायंकाळी घरी परत येणाऱ्या जनावरांनाही गारपिटीचा तडाखा बसला. लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यालाही फटका बसला.   मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटे दणका दिला. काढणीला आलेली आणि सोंगून ठेवलेली पिके भिजली तर पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली. यामध्ये मका व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. फळपिके व आंबा मोहरालाही फटका बसला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्‍याच्या काही भागांत ज्वारीचे पीक आडवे झाले. काढणी केलेल्या हरभरा व गव्हाचे ढिगारे भिजले.  सोलापूर जिल्ह्यात रविवारी उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ आणि माढा भागात गारांसह अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, मका या काढणीस आलेल्या पिकांना त्याचा फटका बसला. द्राक्ष आणि डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या रब्बी ज्वारीची काढणी आणि द्राक्षहंगाम सुरू आहे. उत्तर सोलापूर, बार्शी भागात द्राक्षाचे क्षेत्र चांगले आहे. काही भागात डाळिंबही आहे. या फळबागांना त्याचा फटका बसला. या पावसाने पक्व द्राक्ष मण्यांना पावसाच्या पाण्याचा चांगला मारा बसला. त्यामुळे काही प्रमाणात द्राक्षगळ झाली. अनेक भागात ज्वारी, गहू, हरभऱ्याची काढणी सुरू आहे. काहींनी ज्वारी, गहू काढून ठेवला आहे. या पावसामुळे तो भिजला. या पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे.  नगर जिल्ह्यात नगर, पाथर्डी, राहुरी, कर्जत तालुक्यांतील काही भागांत सरी कोसळल्या. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीला फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात बिजवडी, राजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, जाधववाडी आदी गावांतील पिकांना फटका बसला. शेतात ज्वारी, कांद्याची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ज्वारीची कणसे, कडबा, कांदा उघड्यावरच असताना अचानक आलेल्या पावसाने नुकसान झाले. बहार धरलेल्या फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. असे आहे पिकांचे नुकसान 

  • मका, गहू, ज्वारी पीक आडवे झाले 
  • काढणीला आलेल्या हरभऱ्याचे घाटे गळून पडले 
  • कांदा पिकात पाणी साचल्याने नुकसान
  • काढणीस आलेली द्राक्ष, मोसंबी फळबागांना तडाखा
  • वादळी वारे आणि गारपिटीने आंबा मोहर गळाला
  • बहार धरलेल्या फळबागांना फटका 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com