पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शनिवारी (ता.१०) सायंकाळी पुणे, कोल्हापूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नगर, पालघर या ठिकाणी पूर्वमोसमीच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. यामुळे कांदा, गहू, द्राक्षे, कलिंगड भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील बेलसर येथे शेतात काम करणाऱ्या विकास केदार या तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. भरतगाव (दौंड) येथील शेतकरी शंकर भिकाजी कांबळे यांच्या पोल्ट्रीचे शेड पूर्णपणे नुकसान झाले.
राज्यात दोन दिवसापासून काही भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. शनिवारी सकाळपासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अचानक ढग भरून आल्याने अनेक ठिकाणी पूर्व मोसमीचा वादळी पाऊस पडत असल्याने गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, कांदा, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत येत असताना पावसामुळे आणखी नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, द्राक्षे, कलिंगड अशा पिकांची काढणी सुरू केली होती. मात्र, अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान होत आहे. त्यातच मागील दोन ते तीन दिवसापासून पाऊसही पडत आहे. यामुळे गहू, हरभरा पिकांना फटका बसत आहे. त्यातच ही पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोनामुळे उत्पादित झालेल्या शेतमालाची विक्री करताना येत असलेल्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेकांना शेतमाल कुठे विकायचा असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. त्यातच पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे अडचणीचा डोंगर पुढे राहत आहे. पुणे जिल्हयात जुन्नर, हवेली, खेड, दौंड, शिरूर, नगर भागात वादळी पाऊस झाला. यामुळे बेलसर येथे दुपारी तीन वाजे दरम्यान शेतात काम करत असलेल्या तरूणांच्या अंगावर वीज पडून आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला.
दौंडमधील भरतगाव येथे जोरदार वादळी पावसाने भरतगाव येथील पूर्ण पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले. त्यामुळे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे. या पोल्ट्री शेड नुकसानीचा गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे. तसेच मांजरी, हडपसर, यवतच्या पश्चिम भागात विजेच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस जोरदार पणे सुरू झाला .सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस जोरदार पडत होता. रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत आहे. याशिवाय आंबा कैरीच्या अवस्थेत आहे. द्राक्षांची काढणीही वेगात सुरू आहे. मात्र, अचानक होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान होऊ लागले आहेत.
रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये मंडळ निहाय झालेला पाऊस
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.