विदर्भ, मराठवाड्यात पावसासह गारपिटीने दाणादाण 

banana crop damage
banana crop damage

पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात बुधवारी (ता. १) हलका ते जोरदार पाऊस झाला. नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणीत पाऊस आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने रब्बी पिकांसह कापूस, तूर आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही भागांत गुरुवारी (ता.२) सकाळी हलका ते जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 

वाशीम जिल्ह्यातील देगाव, वारा जहाँगीर, देपुळ, कुंभी, भुली, विठोली परिसरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. तर, मानोरा तालुक्यात भुली विठोली परिसरही गारपिटीच्या तडाख्यात सापडला. या पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांचे पाऊस आणि गारपिटीने नुकसान झाले. 

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील अनेक मंडळामध्ये गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस, गारपिटीमुळे तूर, हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातही पावसाने हजेरी लावली.  नांदेड जिल्ह्यातील माहूर, मुदखेड, भोकर, लोहा तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. माहूर तालुक्यातील माहूर, वानोळा, वाई बाजार, सिंदखेड आदी मंडळामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. रुई, धानोरा आदी गावांच्या परिसरात अर्धा ते एक तासभर झालेल्या जोरदार पावसात सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. गारपिटीमुळे तुरीचे पीक झोडपून निघाले. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. 

विदर्भातही हजारो हेक्‍टरवरील फळबागा, कपाशी पीके बुधवारी (ता.१) रात्री झालेल्या गारपीट आणि पावसाने उदध्वस्त झाली. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल, नरखेड तालुक्‍यातील इसापूर, झिल्पा, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी शिवारात गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्याच्या काही भागातही गारपीट झाल्याने मृग बहाराच्या फळांचा दर्जा बिघडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्‍यातील शिरपूर, टाकरखेडा, लाडगाव, वर्धा मनेरी, जळगाव शिवारात गारपीट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर यवतमाळ जिल्ह्यात पावसाने कापूस पिकांचे नुकसान झाले.  २४ एकरांवरील केळीला फटका  नांदपूर (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील बाळा जगताप यांची यावर्षी सुमारे २४ एकरांवर केळी होती. भावात घसरण झाल्याने त्यांनी वाट पहावी म्हणून झाडावर घड ठेवले होते. थंडीमुळे केळी खराब होण्याची शक्‍यता कमी होती, अशातच गुरुवारी रात्री झालेल्या वादळवाऱ्यामुळे त्यांची केळीबाग पूर्णपणे उदध्वस्त झाल्याने ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील इतरही केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.  या पिकांचे झाले नुकसान  कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, मोसंबी, आंबा, केळी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com