कोल्हापुरातील पश्चिम भागात पीक नुकसानीची व्याप्ती वाढणार

पावसामुळे पिके पाण्याखाली
पावसामुळे पिके पाण्याखाली

कोल्हापूर  ः जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी पश्‍चिमेकडील शिवारात अद्यापही पाणी साचून राहिल्याने पीक नुकसानीच्या व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अद्यापही वाफसा नसल्याने शेतात जाणे शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे पंचनामे पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याचे चित्र पश्‍चिम भागातील आहे.

चंदगड तालुक्‍यात स्थिती बिकट बनली आहे. तालुक्‍यात सतत कोसळणारा पाऊस, कुंद वातावरण यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ऊस पिकासह नाचणी, भुईमूग, मिरची, रताळे, बटाटा ही सर्वच पिके कुजलेल्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून शासनाने पीक पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोकण सीमेवरील तिलारीनगर भागात सर्वाधिक पावसाची नोंद होते. या विभागातील हेरे येथील पर्जन्यमापकाचा विचार करता ३२०० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. हेरे ते तिलारीनगर हे अंतर विचारात घेता तिलारीनगर भागात यापेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्याचा फटका पिकांना बसला आहे. पिकांच्या वाढीसाठी पावसाइतकीच सूर्यप्रकाशाची गरज असते; मात्र गेले तीन महिने या भागात सूर्यदर्शन झालेले नाही. जराही उघडीप नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास वाव नाही. परिणामी पिके कुजली आहेत. नाचणी, भुईमूग, मिरची, रताळी ही पिके पूर्णतः खराब झाली आहेत. उसाच्या सरीत दोन फुटांपेक्षा अधिक पाणी साचले असून पाने कुजली आहेत. वाढीवरही परिणाम झाला आहे. महसूल प्रशासनाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

कोवाड परिसरात घरांच्या पडझडीसह शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नदीकाठाची पिके सततच्या पाण्यामुळे कुजली आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, गार वारा व पावसाच्या जोरादार कोसळणाऱ्या सरी; असे इथले वातावरण आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पाण्यात बुडलेल्या पिकांची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सूर्यप्रकाश नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. परिसरात चार हजार हेक्‍टर क्षेत्रात भाताचे पीक आहे. यापैकी सत्तर टक्के भात क्षेत्राच्या परिसरात पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी शेतातून पाणी साठल्याने भांगलण व कोळपणीची कामे रखडली आहेत. शेतातील वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांना खते टाकण्याची वेळ आली आहे. तसेच पाण्याची दलदल व ढगाळ वातावरणामुळे उसाची वाढ कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी उसाचे क्षेत्र जास्त असले तरी एकरी उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com