खरीप पीकविमा अर्जांमध्ये त्रुटी

खरीप पीकविमा अर्जांमध्ये त्रुटी
खरीप पीकविमा अर्जांमध्ये त्रुटी

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2017 च्या खरीप हंगामामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने विमा कंपनीकडे पाठविलेले 16 हजार 177 अर्ज त्रुटीमुळे विमा कंपनीने नाकारले होते. त्यापैकी 2 हजार अर्जांतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्रुटींची तत्काळ पूर्तता करून परिपूर्ण अर्ज विमा कंपनीकडे पाठविणे आवश्‍यक आहे, अन्यथा अनेक तालुक्‍यांतील शेतकरी विमा नुकसानभरपाई परतावा मिळण्यापासून वंचित राहू शकतात.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2017 च्या खरीप हंगामामध्ये ऑनलाइन विमा प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. गावागावांतील जनसुविधा केंद्र, विविध बॅंका, वैयक्तिकरीत्या असे विविध प्रकारे विमा प्रस्ताव सादर करण्यात आले. अर्ज सादरकरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या घोळात अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्जदेखील स्वीकारण्यात आले. जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीमार्फत खरीप पीकविमा योजना राबविली जात आहे. यंदा जिल्ह्यातील 4 लाख 20 हजार 975 हेक्‍टरवरील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, भात या नऊ पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी एकूण 6 लाख 89 हजार 259 अर्ज विमा कंपनीकडे सादर केले असून, त्यासाठी 31 कोटी 81 लाख रुपये विमा हप्त्याचा भरणा केला आहे. त्याबाबतची माहिती विमा कंपनीने कृषी विभाकडे सादर केलेली आहे.

परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून संबंधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अपलोड करत असताना विमा संरक्षित क्षेत्र, पिकांची माहिती अपूर्ण असलेले अर्ज विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. त्यामुळे डाटामध्ये तफावत येत असल्याचे छाननीदरम्यान आढळून आले. त्यामुळे विमा कंपनीने त्रुटी असलेले 16 हजार 177 विमा अर्ज नाकारत विमा हप्ता बॅंकेला परत करणार असल्याबाबत कृषी विभाग, तसेच राज्यस्तरीय बॅंक समिती (एसएलबीसी) पत्राद्वारे कळविले होते. याचा फटाक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना बसू नये यासाठी विमा कंपनी आणि जिल्हा बॅंकेच्या अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर बॅंकेने त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू केले. परंतु अद्याप सुमारे 2 हजार विमा अर्जांतील त्रुटी दुरुस्तीचे काम बाकी राहिले आहे, असे विमा कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

बॅंकेने परिपूर्ण विमा अर्ज तत्काळ विमा कंपनीकडे सादर करावेत, अन्यथा विमा संरक्षण घेतलेले जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांतील शेतकरी विमा परताव्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या परिस्थितीत पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु त्रुटीमुळे अर्ज नाकारल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com