दुष्काळामुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा ओढा कमी

सांगलीत १० लाख ४२ हजार टन उसाचे गाळप
सांगलीत १० लाख ४२ हजार टन उसाचे गाळप

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाणीटंचाई आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झाला आहे. रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी शेतकरी बँकेकडून पीक कर्जाची मदत घेतात. मात्र, पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामात पिकांची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्याचे टाळत आहेत. आतापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अवघ्या २९ हजार ८१२ शेतकऱ्यांनी १५९ कोटी ६७ लाख ८८ हजार रुपयांचे पीककर्ज घेतल्याचे दिसून येते.  

जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

यंदा पावसाळ्यात कमी झालेला पाऊस व परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे रब्बी हंगामात चांगलाच अडचणीत आला आहे. पुणे जिल्हा बँकेने चालू वर्षी रब्बी हंगामासाठी ७२७ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे कर्ज घेऊन ते पुन्हा परत फेडण्यापेक्षा कर्ज न घेतलेले बरे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळे अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्याचे टाळत आहे.   

गेल्या वर्षी ३० हजार ८४३ शेतकऱ्यांनी ९३  कोटी ६५ लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी रब्बी हंगामात पीक कर्जाच्या वाटपात वाढ झाली असली, तरी ३०-४० टक्क्यांपेक्षा अधिक वाटप होणार नसल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ११ टक्के दराने वाटप केले जाते.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होते. जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

तालुकानिहाय झालेले पीक कर्जाचे वाटप आणि रक्कम
तालुका पीक कर्जाची रक्कम
आंबेगाव २८ कोटी ८४ लाख ३९ हजार रूपये,
बारामती  ९ कोटी ५० लाख ६१ हजार
भोर  १३ कोटी ५६ लाख ४० हजार
दौड  ८ कोटी ४७ लाख १४ हजार
हवेली  ४ कोटी १ लाख ७४ हजार
इंदापूर  ८ कोटी ९४ लाख ६ हजार
जुन्नर  २७ कोटी २२ लाख ६९ हजार
खेड  ३४ कोटी २५ लाख ३८ हजार
मावळ  ९ कोटी २३ हजार ६८ हजार
मुळशी  ४ कोटी ८९ लाख ७६ हजार
पुरंदर  ३ कोटी ६४ लाख ५६ हजार
शिरूर  ५ कोटी १७ लाख २९ हजार
वेल्हा  १ कोटी ९० लाख १८ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com