राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील खरीप हंगामाची झालेल्या हानीचा अंतिम आकडा अद्याप शासनाच्या हाती आलेला नाही. मात्र आतापर्यंत संकलित आकडेवारीनुसार ४५ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झालेली आहेत.
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

पुणेः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील खरीप हंगामाची झालेल्या हानीचा अंतिम आकडा अद्याप शासनाच्या हाती आलेला नाही. मात्र आतापर्यंत संकलित आकडेवारीनुसार ४५ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झालेली आहेत. प्रशासन व्यवस्थेचे लक्ष आता केंद्र व राज्याच्या घोषणेकडे लागू आहे. मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी केंद्रीय निधीची वाट न बघता राज्य सरकार स्वनिधीतून ‘पॅकेज’ जाहीर करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

“व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही खरीप पिकांची हानी मोठी असण्याची शक्यता आहे. महसूल खात्याने ही हानी ४२ लाख हेक्टरच्या पुढे असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. तसेच कृषी खात्याला आतापर्यंत ४५ लाख हेक्टरवरील हानीचे आकडे प्राप्त झालेले आहेत. तथापि, पुढेदेखील अवकाळी पाऊस होण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे १०० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चांगले पॅकेज लवकर घोषित करावे लागेल,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

‘‘केंद्र सरकार कोणत्याही राज्याला केवळ राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) मदत करते. मात्र त्यासाठी केंद्राला पीकपंचनाम्याअंती तयार होणारा अहवाल पाठवावा लागतो. त्याकरिता आधी सर्व जिल्ह्यात पंचनामे पूर्ण होणे गरजेचे आहे. पंचनाम्यांवरील आधारित माहितीतून राज्य शासन केंद्राकडे मदतीची मागणी करू शकते. पण ही मागणीदेखील तत्काळ मंजूर होत नसते. त्यासाठी आधी केंद्रीय पथक राज्यात येईल आणि त्यानंतर निर्णय होतो. यासाठी बराच अवधी लागेल,” असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

केंद्रीय मदत हाती येईल तेव्हा येईल; त्याआधी राज्य शासन स्वनिधीतून तत्काळ मदत करू शकते. त्यासाठी केंद्राची मान्यता घेण्याची गरज नाही. राज्य नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) त्वरित मदत वाटता येईल. हा निधी कमी असतो. मात्र विशेष बाब म्हणून अकस्मिक निधी उभारून राज्याकडून मदत वाटता येईल. प्रतिहेक्टरी नेमकी किती मदत द्यावी हा निर्णयदेखील राज्य शासन घेऊ शकते, असे मत महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दरम्यान, कृषी खात्याने पीक पंचनामे, पूर्वसूचना प्राप्त करणे, त्यानुसार पाहणी करणे अशा विविध कामांना राज्यभर वेग दिलेला आहे. महसूल-ग्रामविकास व कृषी असे तीन खात्यांचे मिळून संयुक्त पंचनामे तयार होतात. ते वेळेत पूर्ण करून राज्य शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे आपापली कामे सांभाळून महसूल विभागाला पंचनाम्यासाठी मदत करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 

तत्काळ काय मदत होऊ शकते...

  • राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) मदत केंद्र शासन मदत मंजूर करू शकते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कोरडवाहू पिकास प्रतिहेक्टरी ६८०० रुपये, बागायतीला १३५०० रुपये, तर फळबागेसाठी १८ हजार रुपये मिळू शकतात. मात्र ही मदत एका खातेदाराला कमाल दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत असेल. 
  • राज्य नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) राज्य शासन तत्काळ मदत देऊ शकते. त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही. तसेच या मदतीची रक्कम कितीही असू शकते.
  • पीकविमा योजनेच्या कामकाजाची स्थिती 

  • शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचना ः २७ लाख ५६ हजार १५६ (२४ सप्टेंबरपर्यंत)
  • पूर्वसूचनेनुसार काय केले जात आहे? ः विमा कंपनी व कृषी विभागाकडून क्षेत्रीय पाहणी 
  • नुकसानभरपाई कशी मिळणार? ः संबंधित पिकाच्या एकूण विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसानभरपाई म्हणून मिळेल.
  • भरपाईची उर्वरित रक्कम केव्हा मिळेल? ः कृषी खात्याकडील पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर.
  • विम्याची नेमकी स्थिती जाणून घ्या

  • सध्या नुकसान झाल्यास ते ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ म्हणून गणले जाईल का?ः नाही. कारण, कापणीला १४ दिवस बाकी असताना जर पिकाचे नुकसान झाले तरच ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ (मिडसीझन अॅडव्हर्सिटी) असे म्हटले जाते. त्यानुसार शेतकऱ्याने ७२ तासांच्या पूर्वसूचना दिल्यानंतर पाहणीअंती योग्य वाटल्यास तो २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाईस ‘तत्काळ’ पात्र ठरत होता. 
  • मग आता नुकसान झाल्यास? : आता पूर, ढगफुटी किंवा दीर्घकाळ शेत जलमय राहिल्याने पिकाचे झाल्यास ते ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ म्हणून गणले जाईल. त्यात संबंधित शेताची वैयक्तिक पाहणी किंवा सामूहिक क्षेत्र पाहणी करून नुकसान निश्‍चित केले जाईल. पण येथे भरपाई तत्काळ न मिळता ती पीककापणी प्रयोगानंतर मिळणार आहे. 
  • पण शेतीमाल काढून तो सुकवण्यास किंवा वाळवण्यासाठी शेतातच ठेवलेला असेल आणि त्याचे नुकसान झाल्यास? : असे नुकसान ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ किंवा ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ गृहीत न धरता. …
  • नुकसानीचा आतापर्यंतचा प्राथमिक अंदाज

  • खरीप पिकांचे नुकसान झालेले क्षेत्र ः ३५ लाख १ हजार ५५५ हेक्टर
  • नुकसानीचा कालावधी ः ३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या दरम्यान
  • गुलाब चक्रीवादळ स्थितीमुळे झालेले नुकसान ः १९.५०  लाख हेक्टर 
  • नुकसानग्रस्त जिल्हे ः एकूण २४. त्यापैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक हानी. 
  • नुकसानग्रस्त क्षेत्राचे प्राथमिक आकडे जळगाव जिल्हाः ३.९५ लाख हेक्टर, सोलापूर ७० हजार, औरंगाबाद ३.५९ लाख हेक्टर, जालना ४.३२ लाख, बीड ५.१५ लाख, उस्मानाबाद २.५६ लाख, परभणी १.४३ लाख, नांदेड ५.३२ लाख, हिंगोली ३.५० लाख आणि बुलडाणा जिल्हा १.३१ लाख हेक्टर.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com