उष्णतेच्या लाटेने पिके होरपळली

राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात तापमान ४३ ते ४६ अंशाच्या वर गेल्याने या भागातील भाजीपाल्यासह फळपिके वाढत्या बाष्पीभवनाने होरपळू लागली आहेत.
Heatwave
Heatwave

पुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात तापमान ४३ ते ४६ अंशाच्या वर गेल्याने या भागातील भाजीपाल्यासह फळपिके वाढत्या बाष्पीभवनाने होरपळू लागली आहेत. भाजीपाल्यासह केळी, संत्रा, मोसंबी, आंबा ही फळपिके वाढत्या तापमानाने प्रभावित होत आहेत. केवळ भूस्तरावरीलच नव्हे, तर जमिनीच्या तापमानातही वाढ झाल्याने पिकांची वाढ खुंटणे, मुळं सुकण्याचे प्रकार घडू लागली आहेत.   सुर्य आग ओकत असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात राज्यात उष्ण लाट आली आहे. सोमवारी (ता. २५) राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ विदर्भातील नागपूर येथे ४६.७, तर चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. देशात सर्वात उष्ण ठरलेल्या या तिन्ही शहरांचा जगभरातील सर्वात उष्ण दहा शहरांमध्ये समावेश आहे.   जगभरातील हवामानाच्या नोंदी घेणाऱ्या ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळावर जगभरातील सर्वात उष्ण शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात येतात. यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये इराकमधील तूज या शहरात जगभरातील उच्चांकी ५०.५ अंश सेल्सिअस तर पाकिस्तानमधील नवाबशाह शहरात ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. या उष्ण शहरांच्या यादीत पश्‍चिम राजस्थानमधील चुरू शहर चौथ्यास्थानावर तर नागपूर आणि चंद्रपूर अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर असल्याचे संकेतस्थळावर नमुद करण्यात आले आहे. तेलंगणातील अदिलाबाद येथेही ४६.३ अंशाची नोंद झाली आहे.    उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उष्ण लाट आली असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता.२६) देशात तीव्र उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुढील पाच दिवस विविध देशाच्या भागात उष्ण लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, धुळे ४३.५, जळगाव ४४.६, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३२.७, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.४, निफाड ४०.०, सातारा ३९.६, सांगली ४०.२, सोलापूर ४४.५, डहाणू ३४.८, सांताक्रूझ ३३.८, रत्नागिरी ३३.९, औरंगाबाद ४२.३, परभणी ४५.४, नांदेड ४५.०, अकोला ४६.१, अमरावती ४५.६, बुलडाणा ४२.५, ब्रह्मपुरी ४४.४, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४६.०, नागपूर ४६.७, वर्धा ४५.८.   राज्यात उष्ण लाटेचा इशारा कायम सुर्य तळपू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणे अवघड ठरत असताना, आज (ता.२६) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात उन्हाचा चटका चांगलाचा वाढला असून, सोमवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरपाठोपाठ चंद्रपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, तर मराठवाड्यातील परभणी, आणि नांदेड येथे उष्ण लाट होती. तर उर्वरीत महाराष्ट्रातही उन्हाचा ताप वाढला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com