सातारा : महापुरातून सावरलेली पिके पावसामुळे पुन्हा अडचणीत

महापुरातून सावलेल्या पिकांना मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाचा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने खरिपातील पिके घेतली. मात्र त्यावर पावसाची अवकृपा झाल्याने पिके हातची जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झालेले नुकसान न भरून येणारे आहे. त्याचा विचार करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी. - नीलेश भोसले, शेतकरी, तांबवे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराच्या फटक्यातून शेतकरी सावरतोय न सावरतोय तोच आता मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अचानक मोठा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. खरिपातील हातातोंडाशी आलेली पिके शेतात पाणी साचून, तर ज्वारी, भाजीपाला, पालेभाज्यांची पिके, केळी, द्राक्षे ही पिके पावसाच्या माऱ्याने वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच हवामान विभागाने तर या महिनाअखेरपर्यंत असाच पाऊस सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावरच पाणी फिरणार अशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात घेतात. पावसाचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले असल्याने पिकांच्या वाढीचा प्रश्न पावसाच्या पाण्यावर मिटतो. त्यानंतर परतीचा पाऊसही चांगला होत असल्याने पिकांना त्याचा दिलासा मिळतो. त्या आशेवर शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली.

त्यामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार यंदा सोयाबीनची ५९ हजार १९६, भुईमुगाची ३३ हजार २३०, भाताची ४१ हजार २६५, ज्वारीची १६ हजार ८७९, मक्याची ११ हजार ७८१, तृणधान्याची १ लाख ३२ हजार ३४७, कडधान्यांची ५४ हजार १७५, तीळ, सोयाबीन, कारळा या गळीत धान्यांची ९३ हजार २५६, उसाची २ लाख ९० हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि पेरणी झाली. त्यातील तब्बल ३८ हजार हेक्टरवरील पिकांना महापुराचा फटका बसला. पाऊस आला म्हणजे आठवडाभर मुक्कामच हालवत नाही अशीच सद्यःस्थिती आहे.

मागील महिन्यात महापूर आला. त्यामुळे नदीकाठची आणि विशेषतः पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके, भात, सोयाबीन, हळद, मका, ज्वारी, कडधान्य, भरडधान्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही काही हेक्टर क्षेत्रावरील पिके वाचली. त्या पिकांमध्ये पोटरे भरण्याच्या वेळेसच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने महापुरातून सावरलेल्या पिकांसाठी सध्याचा पाऊस कर्दनकाळच ठरला आहे. पावसाच्या मोठ्या थेंबाने पोटऱ्यात आलेली ज्वारी काळी पडू लागली आहे. त्याचबरोबर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाजीपाला आणि पालेभाज्यांची पिके वाया गेली आहेत. तीच स्थिती अन्य पिकांचीही आहे. परिणामी, यंदाचा खरीप हंगामाच वाया जाण्याच्या स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com