पावसाअभावी पिके सुकू लागली
पावसाअभावी पिके सुकू लागली

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिके अडचणीत

गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नाही. सोयाबीन, मूग, उडीद शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. विहिरीला थोडे पाणी आले आहे. पण वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. - काशिनाथ सांगळे, केळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली.

नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आजवर अपेक्षित पावसामध्ये २३.८४ ते ४२.९० टक्के एवढी तूट आली आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे फुलोरा, परिपक्वता, वाढीच्या अवस्थेतील खरीप पिके अडचणीत आली आहेत. दुष्काळाचे सावट दिवसागणिक गडद होत असल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.

अनेक मंडळांमध्ये विहिरींना पाणी न आल्यामुळे संरक्षित सिंचनाची सोय नाही. पाणी असलेल्या भागात कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहे. दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी नैसर्गिक असो वा कृत्रिम पण दमदार पावसाची गरज आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यात आजवर अपेक्षित पावसामध्ये २३.८४ ते ४२.९० टक्के तूट आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, लोहा, हदगाव, उमरी या तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ३७.३९ ते ४९.०२ टक्के पाऊस झाला. देगलूर तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात बोरी मंडळात २४.८, चारठाणा मंडळात १८.५, आडगांव  मंडळात २२ टक्के पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २८.९, जिंतूर तालुक्यात ३४.३, सोनपेठ तालुक्यात सरासरी ४०, पालम तालुक्यात सरासरी ३६.६, गंगाखेड तालुक्यात सरासरी ४०.७, सेलू तालुक्यात ३०.६, पाथरी तालुक्यात सरासरी ३३.७, मानवत तालुक्यात ४१.६, पूर्णा तालुक्यात ४७.४ टक्के एवढा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या २७ ते ५२ टक्के पाऊस झाला आहे.

खरीप हंगामातील दोन ते चार महिन्यांच्या कालावधीत येणा-या मूग, उडिद, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकांना पावसाच्या खंडाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ही पिके फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. परिपक्वेतेच्या अवस्थेत पावसाने ओढ दिली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नाही. संरक्षित सिंचनासाठी पाणी नाही त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे.

पाते, फुले, बोंडे लागण्याच्या अवस्थेतील कपाशी तसेच तूर या पिकांची वाढ खुंटली आहे. कपाशीवर रसशोषक किडी, बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाचा खंड आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शेतकरी प्रतिक्रिया

आमच्या शिवारात उशिरा पाऊस झाल्यामुळे १ ऑगस्टला पेरणी उरकली. गेल्या १५ दिवसांहून अधिककाळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनला पाण्याचा ताण बसला असून वाढीवर परिणाम झाला आहे. 

- डॉ. अनिल बुलबुले, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी.

सुरवातीला आमच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपातील सर्वच पिके चांगली आहेत.परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. चार दिवसांत पाऊस न झाल्यास नुकसान होणार आहे.  - नागोराव सुर्यवंशी, रुई, ता. माहूर, जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com