अतिवृष्टीने सातारा जिल्ह्यातील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

सातारा  : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले असून सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांत आले व हळदीचे कंद कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावळी तालुक्‍यांत अतिवृष्टी होत आहे. परिणामी, या तीन तालुक्‍यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. यासोबतच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. सोयाबीन व घेवडा पिकांत पाणी तुंबल्याने पाने पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी कडधान्याची पिके पिवळी पडून कुजू लागली आहेत.

सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, कऱ्हाड तालुक्‍यातील नगदी पीक असलेल्या आले व हळदीचेही नुकसान होऊ लागले आहे. आले व हळद पिकात पाणी तुंबल्याने रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ही पिके पिवळी पडू लागली आहेत. या वर्षी आले व हळदीला मे, जूनमध्ये चांगला दर आल्याने या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. आता अतिवृष्टीमुळे ही पिकेही धोक्‍यात आली आहेत. जुने आले लागू लागल्याने ते काढून टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे मिळेल तो दर शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे.

सध्या ही अतिवृष्टी ऊस पिकाला फायद्याची आहे; तर भुईमूग पीकही वाया जाण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत पाऊस थांबण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा, खरिपाची सर्वच पिके वाया जाणार आहेत. पुढील एक-दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस उघडला आणि ऊन पडू लागल्यास सोयाबीन व भुईमूग पीक वाचण्याची चिन्हे आहेत. 

कृषी विभाग अडकला नियमात  सध्यातरी शेतीच्या नुकसानीबाबत शासनाकडून पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. कृषी विभाग नियमात अडकला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.   

शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाण्याचा विसर्ग कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी या प्रमुख नद्यांमध्ये केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले आहे. यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. गेल्या दोन दिवसांपासून ही पिके पाण्याखाली असल्याने कुजून नुकसान होणार आहे. तसेच, कृषिपंपही पाण्याखाली असून, काही पंप वाहून गेले असल्याची भीती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com