परभणी, हिंगोलीत वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

वादळी पावसाने पिकांचे नुकसान
वादळी पावसाने पिकांचे नुकसान

परभणी  ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. ५) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे केळी पीक तसेच रेशीम कीटक संगोपनगृह, शेडनेटगृह यांच्यासह घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडात पूर्वमोसमी पाऊस होत आहे. बुधवारी (ता. ५) रात्री जोरदार वाऱ्यामुळे जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाजवळील सिंचनासाठी पाणी असलेल्या निवळी बुद्रुक तसेच सेलू तालुक्यातील आडगाव दराडे शिवारातील केळीचे उभे पीक मोडून पडले. एकीकडे पाण्याअभावी उन्हाच्या चटक्यामुळे केळी पीक होरपळून गेले, तर दुसरीकडे मुबलक पाणी असल्यालेल्या भागात केळीचे घड उतरण्याच्या अवस्थेत असताना वादळी वाऱ्यामुळे पीक उद्‍ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील तरुण शेतकरी सुदर्शन शिंदे यांनी दुष्काळी स्थितीतही रेशीम शेती उद्योग सुरू केला. त्यासाठी दोन एकरांवर तुती लागवड केली. एक लाख रुपये खर्च करून रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. परंतु वादळी वाऱ्यामुळे त्यांचे संपूर्ण शेड कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेल्याने अनेकजण जखमी झाले. वीज कोसळून बैल जोड्यांसह अन्य जनावरे मृत्युमुखी पडली. आधीच दुष्काळ त्यात खरीप पेरणीच्या तोंडावर झालेल्या वादळामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com