शेतातील पिके वाळून गेली, कामासाठी स्थलांतराची वेळ

शेतातील पिके वाळून गेली, कामासाठी स्थलांतर
शेतातील पिके वाळून गेली, कामासाठी स्थलांतर

औरंगाबाद ः ‘‘शेतात कपाशी लावली होती. ती थोडी मोठी झाली अन्‌ पाऊसच गायब झाला. अख्ख्या शेतातील झाडे वाळून गेली. मोठे नुकसान झाले. आता पुढे करायचे काय? समस्यांचा डोंगरच समोर उभा आहे...’’ शेतकरी हरिश्‍चंद्र नरोडे आपली व्यथा पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते. 

गंगापूर तालुक्‍यातील जोगेश्‍वरी येथे नरोडे यांची शेती आहे. यंदा दुष्काळाचा फटका त्यांना बसला आहे. नरोडे यांच्या शेतात सध्या काही नसल्याने रामराई तलावाजवळ जनावरे चराईसाठी त्यांनी आणली होती. तलावात पाणीसाठा कमी असल्याने आसपास गवत फारच कमी दिसत होते. २०१७ मध्ये पाऊस बरा झाल्याने तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याचे ते सांगत होते. वाळूज औद्योगिक वसाहत जवळ असल्याने येथे अनेक कंपन्या आहेत. तेथे कामासाठी का जात नाही, अस त्यांना प्रश्‍न विचारला असता जनावरांना सोडून कसं जाता येईल, त्यांना सांभाळणार कोण, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

जोगेश्‍वरी येथून अंबेलोहळकडे जात असताना तुर्काबाद खराडी-अंबेलोहळ या रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसले. तेथे गजानन चोंडकर व मनीषा चोंडकर हे दांपत्य भेटले. रस्त्याच्या कामासाठी ते विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील गांगलवाडी येथून आले होते. त्यांच्या भागातही दुष्काळी स्थिती असून प्यायला पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोजगार हमीची कामे नाहीत. त्यामुळे आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यात यावे लागले, असे चोंडकर दांपत्य सांगत होते. ‘वाशीम ते औरंगाबाद असे पाचशे किलोमीटरचे अंतर हाय. जायला एक रात्र लागते,’ असे मुकादम प्रेमदास पवार सांगत होते. पावसाळा सुरू होईपर्यंत खडीचे काम करावे लागते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

रस्त्याच्या कामावर कमी वयाची मुले-मुली दिसली. चोंडकर हे पवार यांच्या गावचे असल्याने त्यांनी रोजगारासाठी त्यांना औरंगाबाद जिल्ह्यात आणले आहे.      एमआयडीसीचे पाणी विटावा गाव वाळूज औद्योगिक वसाहतीजवळ (एमआयडीसी) आहे. या गावाला एमआयडीसीमधून पाणीपुरवठा होतो. ग्रामस्थांना नळाने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याने हंडा भरायला बराच वेळ लागतो. हेच पाणी प्यायलाही वापरले जाते. एकीकडे उद्योगनगरी जवळ आहे. पण विटावा गाव दुष्काळात होरपळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पाऊस पडल्यानंतर गावाकडे जाऊ. आम्ही आदिवासी आहोत. पण आदिवासी योजनांविषयी आम्हाला कोण सांगणार? - गजानन चोंडकर, मजूर

दुष्काळ व पाण्यामुळे कामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात आलोय. आमच्या भागात हाताला कामच नाही. यावर्षीचा दुष्काळ जास्तच हाय. - नामदेव डाखुरे, मजूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com