नाशिक : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने मालेगाव, कळवण, सटाणा व येवला तालुक्यात काढण्यात आलेली बाजरी, मका पिके जमीनदोस्त झाली. तर, कपाशीचे पीक आडवे झाले. काही भागात कांद्याच्या रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अडचणीत असलेला हंगाम अजून अडचणीत सापडल्याची परिस्थिती आहे.
रविवारी (ता.६) दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यात मालेगाव तालुक्यातील उत्तर भागातील कटवन परिसरात डोंगराळे, गाळणे, चिंचवे, विराणे या परिसरात सोंगणीसाठी आलेले बाजरीचे पीक जमीनदोस्त झाले. तर, मका व कापसाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने बाजरीची कणसे पाणी लागून खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दखवली. त्यामुळे हाती आलेले पीक शेतकऱ्यांपासून दूर जाणार असल्याचे चित्र आहे.
येवला तालुक्यातील उत्तर भागातील कातरणी, विखरणी, आडगाव रेपाळ, विसापूर या परिसरात दुपारनंतर वादळी वाऱ्यासोबत झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामध्ये मका, बाजरी ही पिके अडवी झाली आहेत. तर, लेट खरीप कांद्याच्या तयार रोपवाटिका ही बाधित झाल्या आहेत. यासह किरकोळ प्रमाणात भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले.
सटाणा तालुक्यातील दक्षिण भागात पाऊस व वारे जोरदार असल्याने पिके, मका ऊस भुईसपाट झाली. कळवण तालुक्याच्या पश्चिम भागात मका पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. पाऊस झाल्यानंतर शेतात पाणी असल्याने वाफसा नाही. त्यामुळे सोंगणीस आलेली बाजरी काढता येणार नसल्याने नुकसान वाढणार आहे. तर, कापशीला आलेल्या कैऱ्या पावसामुळे बाधित झाल्याने कापसाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.