उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ९८१ हेक्टर पिकांना अतिपावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, भाजीपाला व उसाच्या पिकाच्या नुकसानीचा यामध्ये प्राधान्याने समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यंदा पाऊस मराठवाड्यात सर्वदूर अपेक्षाच्या पुढे जाऊन पाऊस होत असल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात १ जून ते २४ सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत १२२.६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १०८.६ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
सप्टेंबरमध्ये आजपर्यंत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक मंडळांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात ७४ हजार ३५१ हेक्टर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६७ हजार ६२९ हेक्टरला अतिपावसाचा दणका बसला आहे.
लातूर जिल्ह्यातील जवळपास ३२० व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४३० गावाशिवारातील क्षेत्राचा यात समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील ९० हजार ६१९, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५३ हजार १८४ शेतकऱ्यांचे अति पावसामुळे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात नमूद आहे.
प्राधान्याने सोयाबीन, भाजीपाला, ऊस पिकाचे या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अति पावसाचा फटका बसलेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंचनाम्याअंती नेमक्या किती क्षेत्राचे नुकसान झाले, ही बाब स्पष्ट होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.