चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या शहरीकरणाच्या जोरामध्येही आपल्या शेतीमध्ये आनंद शोधणाऱ्या नितीन गायकवाड यांनी या वर्षी यांत्रिक पद्धतीने लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यांच्याकडे हिरवळीच्या खतासह, भात पेंढा, गिरीपूष्प पाला आणि अॅझोला यांचाही वापर केला जातो. संपूर्ण व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचा त्यांचा कल असतो. पुणे जिल्ह्यातील चांदखेड (ता. मावळ) येथील नितीन चंद्रकांत गायकवाड यांच्या एकूण साडे तेरा एकर शेती आहे. आजूबाजूला वाढत्या शहरीकरणाचे परिणाम दिसू लागले असून, जवळच असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमुळे ते अधिक तीव्र होत आहेत. शेतीत कष्टण्यापेक्षा अधिक व्यवसायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नितीन गायकवाड यांनी आपली शेती केवळ उत्तमच नाही, संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने करण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून भात उत्पादन स्पर्धेमध्ये ते भाग घेत असून, जिल्हा पातळीवर उत्तम उत्पादकतेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. नत्राच्या उपलब्धतेसाठी तीन पद्धतींचा वापर....
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा यांची लागवड केली होती. एकरी साधारणपणे ३५ किलो बियाणे वापरतो. ही पिके फुलोऱ्यात आल्यानंतर चिखलणीवेळी पॉर टिलरच्या साह्याने गाडली जातात. त्यामुळे पिकाला सेंद्रिय कर्ब आणि नत्राची उपलब्धता होते. शेताच्या ओढ्याकडील बांधावर गिरीपुष्पाची लागवड केलेली आहे. त्याच्या सुमारे एक टन फांद्या काढून एक एकर क्षेत्रात टाकल्या होत्या. त्याची पाने गळून शेतामध्ये नत्र उपलब्ध होते. एक एकर क्षेत्रावर भाताचा पेंढा सुमारे एक टन पसरून जमिनीत गाडून टाकला. त्याच प्रमाणे भात शेतामध्ये असलेल्या पाण्यामध्ये अॅझोला वनस्पतींचीही वाढ करतात. ही वनस्पती हवेतील नत्र पॅकेटच्या स्वरुपामध्ये साठवते. ती गाडल्यानंतर भात पिकाला नत्राची उपलब्धता होते. चार सूत्री भात लागवड नितीन यांनी तीन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली आहे.
भाताचा पेंढा व तूस जाळून त्याची पांढरी राख रोपवाटिकेत टाकली जाते. त्यामुळे भात अवशेषातील सल्फरची उपलब्धता रोपांना होते. रोपे अधिक काटक होतात. पुढील रोग कीडीच्या प्रादुर्भावापासून बचाव होण्यास मदत होत असल्याचे नितीन सांगतात. नियंत्रित पद्धतीने दोरीवर भाताची ( १५ सेंमी बाय २ सेंमी ) अंतरावर लागवड केली जाते. एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे लावली जातात. रोपांच्या संख्येत बचत होत असल्याने रोपवाटिकेसाठी एकरी १८ किलो बियाणे पुरते. ही रोपे २१ ते २५ दिवसांची असताना पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. लागवडीनंतर त्याच दिवशी युरिया डिएपी ब्रिकेट चार रोपामध्ये एक या प्रमाणे खोचून घेतल्या. त्यामुळे वाहत्या पाण्यासोबत खते वाहून जाण्याचा धोका कमी होतो. तसेच चारही रोपांना सावकाश खते मिळत राहतात. चारसूत्री लागवडीसाठी मजूराची उपलब्धता अधिक लागते. त्याच प्रमाणे रोपे काढणे व लावणी करणे यासाठी एकरी ३० मजूर लागले. म्हणजे एकरी १४ हजार रुपये खर्च यासाठी होतो. चिखलणी पॉवर टिलरच्या साह्याने करतात. या वर्षी नितीन यांनी प्रथमच यंत्राने एक एकर भात लागवडीचे नियोजन केले होते. त्यासाठी मॅट पद्धतीने रोपवाटिका केली होती. मॅट पद्धतीने रोपवाटिका करण्यासाठी १० किलो बियाणे लागले. त्यासाठी सुमारे २००० रुपये खर्च झाला. ही रोपे १८ दिवसांची असताना पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. नितीन यांनी १३ दिवसापूर्वी एकरी २५०० रुपये या प्रमाणे भाड्याने यंत्र घेत भात लागवड करून घेतली आहे. यंत्राने लागवडीसाठी दोन मजूर लागले. एक एकर लागवडीचे काम केवळ दोन तासात पूर्ण झाले. असा एकूण ५५०० रुपये खर्च झाला. तुलनेसाठी अन्य शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धत
प्रत्येक चुडामध्ये ६ ते १० रोपे लावली जातात. परिणामी रोपवाटिकेमध्ये बियाणे अधिक लागते. दाट लागवडीमुळे ब्रिकेट लावताना अडचणी येतात. सामान्यतः शेतकरी फोकून खते देतात. ती पाण्यासोबत वाहून जाण्याचा धोका असतो. खतांमध्ये युरियाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. परिणामी भात हिरवेगार राहून, शाकीय वाढ अधिक होते. पिके लुसलुशीत राहिल्याने रोग किंडीचा प्रादुर्भाव वाढतो. वरील सर्व कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही तुलनेने उत्पादन कमी येते. पारंपरिक, चारसूत्री आणि यांत्रिक पद्धतीने लागवड यांची तुलना केला असता यांत्रिक पद्धतीने खर्चात बचत झाली आहे. बाकी मजूर व अन्य अडचणींच्या काळात यंत्राने केलेली लागवड अधिक फायदेशीर वाटल्याचे नितीन यांचे मत आहे. गायकवाड यांची भात उत्पादकता
वर्ष | तपशील | उत्पादन प्रति हेक्टर | पुरस्कार |
२०१५-१६ | कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात भाग घेतला | ११० क्विंटल | मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक. |
२०१७-१८ | कृषी विभाग आयोजित पीक स्पर्धा | ११० क्विंटल | मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक |
२०१८-१९ | कृषी विभाग आयोजित पीक स्पर्धा | १४१ क्विंटल | पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक |
२०१९-२० | कृषी विभाग आयोजित पीक स्पर्धा | १३५ क्विंटल | अधिक पावसामुळे उत्पादन स्पर्धा रद्द. उत्पादनही तुलनेत कमी आले. |
माझ्याकडे ३ एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन आहे. तसेच आंबा झाडे १००, पेरु झाडे ३३३ इतकी आहेत. रब्बी हंगामात कलिंगडाची मल्चिंगवर लागवड केली होती. त्याचे २३ टन उत्पादन आले. त्याला लॉकडाऊन स्थितीतही बांधावरून प्रति किलो १५ रुपये प्रती किलो दर मिळाला. त्यानंतर त्याच मल्चिंगवर काकडी केली होती. त्यापासून १५ टन उत्पादन मिळाले. त्याला किमान १५ रु ते कमला २८ रुपये (सरासरी २२ रुपये) प्रती किलो दर मिळाला. या दोन्ही पिकांचे सर्व अवशेष ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत गाडून टाकले. फळझाडांसह या पिकांना जिवामृत, शेणस्लरी यांचा वापर टप्प्याटप्प्याने करत आहे. भाताचे एक एकर क्षेत्र गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने करत आहे. त्याला पुणे जिल्हा परिषदेच्या सेंद्रिय शेतकरी या योजनेअंतर्गत प्रमाणीकरण मिळण्याची शक्यता आहे. शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्र, कृषी विभाग, पंचायत समिती यांच्याकडून मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन मिळते. सर्वात मोठी समस्या ही मजूरांची उपलब्धता आहे. या वर्षी रोपवाटिका सिंचनाने आधीच केली होती. त्यामुळे अन्य लोकांची रोपे तयार होण्याआधी मला भात लागवडीसाठी मजूरांची उपलब्धता होऊ शकली. या वर्षी पहिलाच प्रयोग असल्याने केवळ एक एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली असली तरी पुढील वर्षासाठी यांत्रिक लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल. - नितीन गायकवाड, ७५८८२४९७०९