खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरू

देऊळगावराजा तालुक्यातरब्बीचे सिंचन करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातून २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाणी सोडले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. अखेर सोमवारी (ता. ३०) सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरू The cycle of Khadakpurna Dam finally started
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरू The cycle of Khadakpurna Dam finally started

बुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीचे सिंचन करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातून २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाणी सोडले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. या अनुषंगाने राजकीय पुढाऱ्यांनी नेहमीप्रमाणे श्रेय घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना विविध आवाहने सुद्धा केली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब झाला. अखेर  सोमवारी (ता. ३०) सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.  खडकपूर्णा प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पूर्ण भरला होता. यामुळे या प्रकल्पक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार हे निश्‍चित झाले होते. फक्त नियोजन तातडीने होत नसल्याने पाणी कधीपासून मिळेल याबाबत साशंकता होत्या. दरम्यानच्या काळात राजकीय पुढाऱ्यांनी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. यानंतर प्रशासनाने घोषणा करीत २५ ते ३० नोव्हेंबर या काळात पाणी सोडले जाईल, असे जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पांवरील बंद असलेली मशिनरी रिपेअर करून सुरू करण्यास विलंब लागला. काही तांत्रिक दोष तयार झाल्याने पाणी सोडण्याचे नियोजन लांबले होते. मशीनच्या टेस्टिंग घेतल्या जात असून, बरेच दोष दूर करण्यात यश आल्याने सोमवारी पाणी सोडण्यात आले.   रब्बी हंगामासाठी संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्या शीलाताई शिंपणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानंतर या विभागाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही डावा व उजवा कालव्यात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली. शिक्षक आमदार पदाच्या निवडणुका लागल्याने जिल्हा प्रशासनाला नियोजनासाठीची बैठक घेता आली नाही. शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाण्याची नितांत गरज असल्याचे लक्षात घेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी व खडकपूर्णा प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रकल्पातून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे निर्देश दिले. या बाबत प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून प्रसिद्धी माध्यमाद्वारे २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पाणी सोडण्याची घोषणा केली. हे पाहत राजकीय पुढाऱ्यांच्या समर्थकांनी  सोशल मीडियाद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी खडकपूर्णातून पाणी सोडणार असल्याचा गवगवा केला. कालव्याने पाणी येणार म्हणून शेतकरीही सज्ज झाले. परंतु जाहीर केलेल्या कालावधीत पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने हिरमोड झाला. घोषणेच्या शेवटच्या दिवशी पाणी सोडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com