रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. वादळीवाऱ्यांसह पावसाची संततधार सुरू असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत शेकडो घरांचे नुकसान झाले. पिकांनाही तडाखा बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक इमारतीचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये सकाळपासून जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील काही घरांची किरकोळ पडझड झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनाऱ्यावरील आंबोलगड, माडबन, सागवे, अवळीची वाडी येथील काही घरांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. कशेळी, दांडे अनसुरे, दले, मिठगवाणे, सागवे येथे घरावर झाड कोसळून घरांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डोंगर येथे रस्त्यामध्ये झाड कोसळून रस्ता वाहतूक बंद झाली होती. हरपुडे येथे झाड उन्मळून पडले. भलेमोठे झाड हे बुधाजी घुग आणि पांडुरंग घुग यांच्या घरावर हे झाड पडले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठं नुकसान झाले. तसेच कोंडगाव चावडी जवळ झाड कोसळून सीताराम मोरे यांच्या चिकन दुकानाचे नुकसान मोठे नुकसान झाले.
संभाव्य धोका लक्षात घेऊन अवळीची वाडी येथील ३५, आंबोलगड येथील ६८ कुटुंबातील २५४ लोक, माडबन येथील २० घरामधील ७८ लोक, सागवे येथील ६२ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. वादळाच्या अनुषंगाने तहसीलदार प्रतिभा वराळे या सातत्याने त्या त्या भागातील प्रशासनासह लोकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देत होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी दोन वाजल्यानंतर जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. देवगड निपाणी या राज्यमार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी वीजखांब, विजवाहिन्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवसभर विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. किनाऱ्यावरील गावांना तडाखा किनारी भागातील गावांना यांचा चांगला तडाखा बसला असून, मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्राला उधाण आले आहे. अजस्र लाटा किनाऱ्यावर फुटत आहेत. रत्नागिरीत वेगवान वारे वाहू लागलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.
घरांचे नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने सह्याद्री पट्ट्यातील गावांना तडाखा दिला. वैभववाडी तालुक्यातील ७० हून अधिक घरांचे या वादळात नुकसान झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय कणकवली तालुक्यात १५, दोडामार्ग तालुक्यात १०, सावंतवाडी तालुक्यात ६, मालवण तालुक्यात ३, वेंगुर्ला तालुक्यात ३, घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.