चक्रीवादळाने राज्यभरात दाणादाण 

‘तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. तर अपवाद वगळता सर्वत्र वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. वादळ आणि पावसाने काढणीला आलेल्या हापूस आणि केसर आंबा पिकाला कोट्यवधीचा फटका बसला.
nashik damage
nashik damage

पुणे : ‘तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. तर अपवाद वगळता सर्वत्र वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. वादळ आणि पावसाने काढणीला आलेल्या हापूस आणि केसर आंबा पिकाला कोट्यवधीचा फटका बसला. तसेच फळपिकांसह भाजीपाला आणि उन्हाळी पिकेही उद्ध्वस्त झाली. तर राज्यभरात वाऱ्याने झाडे कोसळून आणि पत्रे उडून शेकडो घरांचेही नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.  चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ठाणे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या सर्व गावांना बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सोमवारी (ता.१७) सायंकाळी हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवरून भूपृष्टावर आले असून ते राजस्थानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. यामुळे गुजरातमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवला आहे. दर तासाला अधिक सक्रिय होणारे हे चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सोमवारी (ता. १७) सायंकाळी पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) किनारपट्टीजवळ धडकले. त्यानंतर वादळाचा वेग कमी होण्यास सुरूवात झाली. दुपारी ते मुंबईपासून पश्चिमेकडे १५० किलोमीटर अंतरावर होते. तर दीव पासून नैऋत्याकडे २२० किलोमीटर, गुजरातमधील वेरावलपासून २६०, कराचीपासून ४९० किलोमीटर अंतरावर होते.  सोमवारी सकाळी वादळाने मुंबईच्याजवळ १५० ते २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वादळाचा वाऱ्याचा वेग ताशी १५० किलोमीटरहून अधिक होता. मात्र, सायंकाळनंतर काही प्रमाणात या वाऱ्याचा वेग कमी झाला होता. आज या वादळाचा वेग आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी काही घरांची पडझड झाली आहे. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावात मोठया प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 

या पिकांना बसला फटका  आंबा, नारळ, फणस, केळी, ऊस, उन्हाळी भुईमूग, कांदा, टोमॅटो, वांगी, कारली, दोडका आदी.  असे झाले नुकसान 

  • वादळाने राज्यभर शेडनेट, पॉलीहाऊसचे नुकसान 
  • कोकणात हापूसला कोट्यवधींचा फटका 
  • पश्‍चिम महाराष्ट्रात भाजीपाला पिकाला फटका 
  • मराठवाड्यात केसर आंब्याचे मोठे नुकसान 
  • विदर्भात पाऊस आणि वादळी वाऱ्याने तारांबळ 
  • खानदेशात केळीसह पिकांना फटका 
  • अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली 
  • अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com