विद्यापिठांनी दुप्पट काम केल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाहीः दादा भुसे

dada bhuse
dada bhuse

पुणे: ‘‘राज्यातील कृषी विद्यापीठांकडे तळागाळातील शेतकरी अतिशय आशाअपेक्षेने बघतो आहे. आपण काम दुप्पट केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी बांधावर जाऊन त्यांच्या भावना आणि गरजा समजावून घ्याव्यात,’’ असे भावनिक आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी विद्यापीठांना केले.  महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची बैठक बुधवारी (ता. २८) कृषिमंत्र्यांनी घेतली. विद्यापीठांचे कुलगुरू, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी जवळपास चार तास चर्चा केली. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले या वेळी उपस्थित होते. ‘‘शेतकरी किंवा ग्रामीण भागाच्या नजरेतून विद्यापीठे काय काम करतात याची मला माहिती आहे. विद्यापीठे कामे करतात मात्र शेतकऱ्यांमध्ये आपलेपणा तयार होण्यासाठी तुम्हाला अजून त्यांच्या जवळ जावे लागेल. त्यांना हवे असलेले संशोधन करावे लागेल. पिके भरपूर असली तरी संबंधित जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि वातावरणामुळे प्रमुख असलेल्या पिकांच्या संशोधनावर भर देता येईल. सरकारी पातळीवरून काहीही अडचणी असल्यास त्या सोडविण्याची आमची तयारी आहे. मात्र, विद्यापीठांनी शेतकरीभिमुख व्हावे,’’ अशा अपेक्षा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केल्या.  ‘‘विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. त्यांना अत्यावश्यक असलेल्या सेवासुविधा पुरवायला हव्यात. शैक्षणिक सुविधांबाबत हयगय नकोय,’’ अशा शब्दात कृषिमंत्र्यांनी राज्यातील सुमार दर्जाच्या कृषी महाविद्यालयांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला.  विद्यापीठांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून प्रत्येक विद्यापीठ नेमके कशा प्रकारे काम करणार आहे याचे सादरीकरण या वेळी झाले. शासनाने मंजूर केलेल्या निधीची प्रतीक्षा विद्यापीठांना असल्याचे या वेळी सूचित करण्यात आले. कृषिमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यापीठांचे प्रलंबित निधींचे वितरण आणि सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने रखडलेल्या प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता असल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले.  या वेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, महासंचालक विश्वजीत माने,  शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर व विस्तार संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी चर्चेत भाग घेतला.  कृषिमंत्र्यांची नम्रता कुलगुरूंना भावली  कृषिमंत्री दादा भुसे यांनी अतिशय नम्रपणे सर्व कुलगुरूंशी संवाद साधत चार तास बैठक घेतल्याने कुलगुरू मंडळी अचंबित झाली होती. ‘‘मी तुमच्यासमोर लहान असून मला विद्यापीठांचे कामकाज, रचना समजावून सांगा, अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी बैठकीला सुरुवात केली. पूर्ण बैठकीत त्यांनी कुलगुरूंचा मान राखून उपयुक्त सूचना केल्या. आमच्या नजरेत असा कृषिमंत्री प्रथमच आला. त्यांच्या बोलण्यात अहंमपणा नसून शेतकऱ्यांसाठी काम करण्याची प्रामाणिक तळमळ दिसली. यामुळे विद्यापीठांच्या कामकाजाला वेग येईल,’’ अशी प्रतिक्रिया एका कुलगुरूने बैठक संपल्यानंतर ‘अॅग्रोवन’कडे व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com