दररोज ३५ लाख लिटर दूध विक्रीविना

मुंबई, पुणे, ठाणे हा त्रिकोण राज्यातील डेअरी उद्योगासाठी महत्वाचा आहे. मात्र, तो हॉटस्पॉटच्या कचाट्यात सापडल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना किमान दोन वर्षे लागतील. — अरूण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन
milk collection
milk collection

पुणे: मुंबई, ठाणे, पुणे ही मुख्य महानगरे कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये अडकल्याने राज्याच्या दूध उद्योगाला रोज ३५ लाख लिटरचा फटका बसतो आहे. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे.  महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले की, दूध उद्योगाची मुख्य बाजारपेठ असलेली ही महानगरे हॉटस्पॉट बनल्याने शेतकरी चिंतातुर आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातून या क्षेत्राला जाणारे रोजचा अडीच लाख लिटर दूध पुरवठा थांबला आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांसाठी रोज किमान एक लाख लिटर दूध वापरले जात होते. तेही थांबले आहे. २५ रुपये प्रतिलिटर दुधाचा भाव गृहीत धरला तर पुणे भागातील शेतकऱ्यांचा या तीन महानगरांकडे जाणारा साडेतीन लाख लिटर दुधाचा पुरवठा थांबला आहे.  महानंदकडून सरकारी अनुदानात सहकारी संघांच्या दुधाची खरेदी सुरू असल्याने संघाने स्वागत केले आहे. मात्र, त्याचा फायदा खासगी डेअरींना मिळत नाही. त्यात पुन्हा दूध वितरणात पोलिसांनी आडकाठी आणली आहे. “ पोलिसांमुळे पुणे व पिंपरी चिंचवड भागातून दुधाची वाहने परत जात आहेत. यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे,” अशी तक्रार दूध उद्योजकांनी थेट गृहमंत्र्यांकडे केली आहे.  पुणे व पिंपरी चिंचवड भागात २७ एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. या कालावधीत दूध, भाजीपाला, किराणा वाहतूक व वितरणास सूट असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, दुधाची दुकाने उघडण्याच्या वेळा सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत तर काही भागात सकाळी १० ते २ वाजेपर्यंत ठेवल्याने गोंधळ उडाला आहे.  “दूध वितरणातील अडचणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह स्थानिक प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत. आम्हांला सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते १० अशा वेळा हव्या आहेत,” अशी माहिती कल्याणकारी दूध संघाच्या सूत्रांनी दिली.  दुग्धजन्य पदार्थांसाठी मुंबईसाठी रोज दहा लाख लिटर दूध वापरले जात होते. ते आता सात लाखावर आले आहे. तर पुण्याचा हाच वापर साडेतीन लाख लीटरवरून दोन लाख लिटरवर आला आहे. म्हणजेच किमान पाच लाख लिटर दुधाचे पदार्थ वापरणे बंद झाले आहे. मुंबईच्या चेंबूर,सिंधी कॉलनी व इतर भागांमधील ५० हजार किलोची पनीर विक्री बंद पडली आहे.  कोरोनाचा संबंध सर्दी, खोकल्याच्या लक्षणाशी आहे. दुग्धजन्य पदार्थ आंबट किंवा थंड असल्याने भीतीपोटी ग्राहकांकडून मागणीही घटली आहे. विशेष म्हणजे मुंबई भागातील १०० रेल्वे स्थानकांवरील ५०० स्टॉल्स, आरेच्या १७५० ठिकाणचे स्टॉल्स बंद आहेत. पुणे भागात आरे, महानंद, गोकूळ, चितळे तसेच इतर सर्व कंपन्यांच्या दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीला तडाखा बसला आहे.   प्रतिक्रिया मुंबई, ठाणे, पुणे या तीन महानगरांना हॉटस्पॉट जाहीर केल्यानंतर त्याचा फटका डेअरी उद्योगाला पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. कारण, मुंबईचा दूध पुरवठा ८० लाख लिटरवरून ६० लाख लिटर तर पुणे भागाचा हाच पुरवठा ४५ लाख लिटरवरून ३२ लाख लिटरवर आला आहे, — संजय भागवतकर, डेअरी उद्योग सल्लागार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com