मध्य प्रदेशात केळीचे रोज लिलाव

आम्ही दरवर्षी केळीची २५ एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करतो. बऱ्हाणपुरातील खरेदीदारांना केळीची विक्री अनेक वर्षांपासून करीत आहोत. केळी बाजारात विकण्यासाठी नेण्याची वेळ आली तर बऱ्हाणपूर येथे घेऊन जातो. बऱ्हाणपूर आमच्या गावापासून २३ किलोमीटरवर आहे. तेथे अपेक्षित दर मिळतात. कमी दर्जाच्या केळीला मात्र तेथे हवे तसे दर मिळत नाहीत. - ऋषिकेश महाजन, केळी उत्पादक, नायगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  : देशात केळी लागवडीत पहिल्या तीन राज्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या तुलनेत केळी पिकाची अल्प लागवड करणाऱ्या मध्य प्रदेशातील केळीसंबंधीची धोरणे सरस आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत मोठे यार्ड केळीसाठी राखीव आहेत. येथे शेतकऱ्यांसमोर रोज लिलाव होतात. केळीचे आगार असलेल्या रावेर किंवा जळगावात कुठेही केळीचे लिलाव होत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीत. यामुळे अनेक उत्पादक केळी बऱ्हाणपुरात विक्रीसाठी नेतात, अशी माहिती मिळाली.

तसेच मध्य प्रदेशात जूनमध्ये वादळात नुकसान सहन करावे लागलेल्या केळी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख रुपये भरपाई जाहीर झाली असून, तिचे वितरण सुरू झाले आहे.  महाराष्ट्रात मात्र हेक्‍टरी १८ हजार भरपाईच जाहीर झाली असून, ती अजूनही केळी उत्पादकांच्या पदरात पडलेली नाही. जूनमध्ये १, २ व ६ या तारखांना जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल व चोपडा तालुक्‍यात केळीचे वादळात नुकसान झाले.

विमासंरक्षण घेतलेल्या केळी उत्पादकांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या. नुकसानीनंतर ४८ तासांत व ४८ तासांनंतर सात हजारांवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु यातील फक्त ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारमधील विधानसभा सदस्यांनी या संदर्भात राज्य सरकार व दिल्ली सरकारकडे साकडे घातले; परंतु विमासंबंधीचा प्रश्‍न सुटलेला नाही. याचवेळी मध्य प्रदेशात सरकारने वादळात नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख रुपये भरपाई जाहीर केली. तिचे वितरण सुरू झाले आहे.

मध्य प्रदेशात फक्त २८ हजार हेक्‍टरवर केळी आहे. तेथे बडवानी, बऱ्हाणपूर भागात केळी अधिक आहे. राज्यात जळगावात सर्वाधिक ४६ ते ४८ हजार हेक्‍टवर केळीची लागवड झाली आहे; तर धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही केळीची लागवड केली जाते. २०१७-१८ मध्ये राज्यात ७३ हजार हेक्‍टरवर केळी होती.

लिलाव पद्धतीने खरेदी मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर येथील केळीची बाजारपेठ रावेरला मागे टाकत आहे. तेथे प्रतिदिन किमान २५० व कमाल ४०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होते. रावेरात प्रतिदिन कापणीचा हंगाम जोमात असला तर २५० ट्रक केळीची आवक होते. धोरणे सुकर असल्याने मध्य प्रदेशात केळी लागवडीत सतत वाढ झाली असून, मागील १० वर्षांत तेथे लागवड क्षेत्र सुमारे १२ हजार हेक्‍टरने वाढले आहे. नर्मदा व तापी नदीकाठी केळीची उत्तम शेती केली जात असून, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील पातोंडी, दापोरा, खोपनार आदी गावे केळी उत्पादनात रावेरातील आघाडीच्या केळी उत्पादक गावांच्या पुढे गेली आहेत, असे सांगण्यात आले.   खरेदीदारांना परवाना देताना बैठक मध्य प्रदेशात केळीच्या व्यापारात ज्यांना यायचे आहे, त्यांना खरेदीसंबंधी परवाना देताना बाजार समिती बैठक घेते. संबंधित खरेदीदार किती सचोटीने व्यवहार करतो, त्याने कुणाची पूर्वी फसवणूक केली होती का, तो स्थानिक आहे का, यासंबंधी विचारविनीमय करून मग खरेदीचा परवाना दिला जातो. यामुळे तेथे केळी व्यापारात फसवणुकीचे प्रकारही कमी असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com