नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला सव्वादोन कोटींचा खर्च

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी आतापर्यंत ४५८ जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. त्यात दोन लाख ८३ हजार जनावरे आहेत. त्यावर दर दिवसाला सुमारे दोन कोटी ३७ लाख ६९ हजार रुपये खर्च केले जात आहेत. जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू झालेल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र कसरत सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाणी नसल्याने जवळपास आठ तालुक्यांत शेती कोरडी पडलेली आहे. आता केवळ पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवणे हाच एकमेव उद्देश आहे. जिल्ह्यात दुभत्या जनावरांची संख्या सतरा लाख आहे. दुष्काळामुळे दावणीला बांधलेल्या पशुधनाचे संगोपन करण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. चारा छावणीसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पशुधनासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष आहे.

छावण्यांची तपासणी करण्यासाठी ३२ पथके तैनात करण्यात आली आहेत. यावर्षी पाणी व चाऱ्याची स्थिती हिवाळ्यातच भीषण झाली. त्यामुळे सरकारला पशूंसाठी छावण्या सुरू कराव्या लागल्या. यापैकी काही छावण्यांमध्ये गैरप्रकारही होत असल्याचे तपासणीत उघड झाले. आतापर्यंत पशुसेवेत कुचराई करणाऱ्या छावणीचालकांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे नगर तालुक्‍यातील छावणीचालकांच्या संघटनेने मध्यंतरी प्रशासनाला निवेदन देत हे दंड मागे घेण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या दंडामुळे छावणीचालक पशूंची काळजी घेत आहेत.

अर्थात आता ‘महसूल’चे लोक मतदान प्रक्रियेत गुंतलेले आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रिया संपल्यावर पुन्हा छावण्यांच्या तपासणीचे सत्र सुरू होईल. अर्थात आतापर्यंत ठोठावलेल्या दंडामुळे पशुसेवेत कुचराई करण्याचे प्रकार पुन्हा होणार नाहीत, अशी प्रशासनाला आशा आहे. दर दिवसाला पशुधन जगविण्यासाठी सव्वादोन कोटी रुपये एप्रिलमध्येच खर्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे.   

छावणीत ७० हजार पशुपालकांचा मुक्काम  छावणीत पशुधनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४५८ छावण्यांत दोन लाख ८३ हजार ४५२ पशुधन दाखल झाले आहे. या पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी ७० हजार पशुपालकांचा मुक्काम छावणीत आहे. श्रीगोंदे तालुक्‍यात तर छावणीत विवाहही पार पडला होता. छावणी हे एक प्रकारचे वसवलेले गावच बनले आहे. हे गाव अजून किमान अडीच महिने तसेच राहणार आहे.  

तालुकानिहाय सुरू असलेल्या छावण्या ः पाथर्डी -१०१, कर्जत - ८८, जामखेड - ५७, नगर - ५९, पारनेर - ४०, शेवगाव - ५९, श्रीगोंदे - ५४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com