राज्यात जलसंकट गडद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : मॉन्सूनने परतीच्या प्रवासात राज्यातील काही भागांतून माघार घेतली अाहे. यंदाचा पावसाळा संपतोय तोच राज्यातील धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागली अाहे.

गेल्या वर्षातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा खूपच कमी पाणीसाठा आहे. या वर्षी सध्या राज्यातील सर्व प्रकल्पांत मिळून अवघा ६५ टक्के पाणीसाठा आहे. सर्व प्रकल्पांत मिळून याच कालावधीत २०१६ मध्ये ८२, २०१७ मध्ये ७५ टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भर पावसाळ्यातच अनेक धरणांतील पाणीपातळी तळाशी गेली आहे.   गुरुवारी (ता.४) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६६ प्रकल्पांमध्ये ९३६.६६ टीएमसी (६५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. १४ सप्टेंंबर रोजी राज्यात ९६१.०२ टीएमसी (६७ टक्के) पाणीसाठा होता.

पावसाळा सुरू असतानाही धरणांतील पाणीसाठा दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. पुढील काळात पाण्याची मागणी वाढणार असून, उन्हाळ्यात लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४७.४३ टीएमसी (७३ टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये १०२.०७ टीएमसी (५३ टक्के); तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ८७.१७ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे.

मराठवाड्यात अत्यल्प पाणीसाठा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून ७१.१४ टीएमसी म्हणजेच अवघा २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ५८.०४ टीएमसी (५७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील उर्वरित धरणांमधील पाणीसाठा स्थिती अत्यंत चिंताजनक असून माजलगाव, मांजरा (बीड), सीना कोळेगाव (उस्मानाबाद) या धरणांनी तळ गाठला अाहे. येलदरी धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ४८.२३ टीएमसी (३० टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ८.७६ टीएमसी (२३ टक्के); तर लहान ८३९ प्रकल्पांमध्ये १४.१६ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.  

पुणे विभागात पाणीसाठा झाला कमी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख धरणे यंदा ‘ओव्हरफ्लाे’ झाल्याने मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. सोलापुरातील उजनी धरण १०० टक्के भरले; तर कोयना धरण ओसंडून वाहिले. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने या सर्व धरणांमधील पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर आला असून, उजनीतील पाणी कमी होऊ लागले आहे. विभागातील सर्व ७२५ धरणांमध्ये मिळून सध्या ४३२.६२ टीएमसी (८१ टक्के) पाणीसाठा आहे. ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१०८.०४ टीएमसी (९३ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये ३०.१८ टीएमसी (६३ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १४.८६ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

नाशिक विभागात ६५ टक्के पाणी नाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये १३५.९२ टीएमसी (६५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच पावसाने ओढ दिल्याने नाशिक विभागात चिंता वाढली होती. मात्र नंतरच्या पावसाने काही प्रमाणात कसर भरून काढली. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळंवडे धरणासह अनेक लहान-मोठ्या धरणांतून पाणी साेडण्यात आले. मात्र त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकली नाही. विभागातील मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये १०१.३६ टीएमसी (७८ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १९.६६ टीएमसी (४७ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.९० टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

कोकणात समाधानकारक स्थिती सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ देऊनही पावसाळ्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने कोकणातील धरणांमध्ये सामधानकारक पाणी जमा झाले आहे. मात्र मुंबईसह शहरी भागाला पाणीपुरवठा करणारे सर्वच प्रकल्पांतील पाणीसाठा आता कमी हाेऊ लागला आहे. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा ११०.७५ टीएमसी (८९ टक्के) पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा, पालघरमधील कवडास, धामनी, सिंधुदुर्गमधील तिलारी प्रकल्पात मुबलक पाणी आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ७९.८६ टीएमसी (९२ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १५.५३ टीएमसी (९० टक्के); तर १५८ लघू प्रकल्पात १५.३६ टीएमसी (७७ टक्के) पाणीसाठा आहे.  

नागपूर, अमरावती विभागात अपुरा पाणीसाठा विदर्भात यंदा पावसाने सरासरी भरून काढली असली, तरी गतवर्षी धरणे कोरडीच राहिल्याने यंदा जेमतेम पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ४९ टक्के; तर अमरावती विभागात ५८ टक्के पाणी जमा झाले आहे. पूर्व विदर्भातील गोसी खुर्द (५० टक्के), कामठी खैरी (४५ टक्के), तातेलाडोह (२८ टक्के), इटियाडोह (५४ टक्के); तर पश्‍चिम विदर्भातील उर्ध्व वर्धा (५२ टक्के), इसापूर (६७ टक्के); तर बेंबळा धरणामध्ये (६१ टक्के) यंदा पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. नागपूर विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ७९.७२ टीएमसी (४९ टक्के); तर अमरावती विभागात ८५.९७ टीएमसी (५८ टक्के) पाणी उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात अाले.  

राज्यातील मोठे, मध्यम, लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४५  १४८.०० ८५.९७  ५८
कोकण १७६  १२३.९२ ११०.७५ ८९
नागपूर  ३८४ १६२.६५  ७९.७२ ४९
नाशिक ५७० २०९.५० १३५.९२ ६५
पुणे ७२६  ५३७.०१ ४५३.०९  ८४
मराठवाडा  ९६५ २६०.३४ ७१.१४ २७
एकूण   ३२६६ १४४१.४१ ९३६.६६ ६५
धरणातील पाणीसाठ्याची मागील तीन वर्षांची ४ ऑक्टोबरपर्यंतची तुलनात्मक स्थिती (टक्केवारी)
विभाग  २०१६ २०१७  २०१८
अमरावती  ७४ ३७  ५८
कोकण ९५ ९५  ८९
नागपूर ७० ४८ ४९
नाशिक ८३ ८२  ६५
पुणे  ८८ ८९  ८४
मराठवाडा ७१ ६६ २७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com