राज्यातील धरणांमध्ये अवघा ४४ टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. पाणीटंचाईच्या झळा वाढतच असताना राज्यातील धरणसाठा झपाट्याने खालावत आहे. शुक्रवारी (ता. ४) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ६४१.८७ टीएमसी (४४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. पूर्व विदर्भात पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली आहे. अमरावती आणि नाशिक विभागातही धरणसाठा ४५ टक्क्यांच्या खाली आला असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. 

गतवर्षी नवीन वर्षाच्या सुरवातीला राज्यातील धरणांमध्ये ६३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तुलनेने १८ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात गतवर्षी ५६, तर नागपूर विभागात ३० टक्के, अमरावती विभागात ३२ टक्के पााणीसाठा होता. यंदा या विभागातील अनेक धरणांमधील पाणीसाठा जानेवारी महिन्यातच तळाशी गेला आहे. राज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४९३.१४ टीएमसी (४८ टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये ८२.७१ टीएमसी (४३ टक्के) तर २८६८ लहान प्रकल्पांमध्ये ६६.०२ (२९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणातून होणारा पाण्याचा उपसा आणि पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली आहे. बाष्पीभवनामुळेदेखील धरणातील पाणी कमी होणार आहे. मराठवाडा विदर्भासह राज्यातील अनेक धरणे लवकरच कोरडी होणार असून, पुढील काळात पाणीटंचाईची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील धरणे रिकामी सातत्याने दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या मराठवाड्यामध्ये यंदाही पाणीटंचाई वाढली आहे. यातच धरणेही कोरडी पडू लागल्याने दुष्काळाच्या झळा वाढणार आहेत. औरंगाबाद विभागातील सर्व ९६४ प्रकल्पामंध्ये मिळून ४०.५० टीएमसी म्हणजेच अवघे १६ टक्के पाणी शिल्लक आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ४२ टीएमसी (४१ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील मांजरा, माजलगाव (बीड) सिद्धेश्वर (हिंगोली), सीना कोळेगाव (उस्मानाबाद) ही धरणे रिकामी झाली आहेत. येलदरी, निम्नतेरणा, निम्न दुधना धरणांनी तळ गाठला आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये २५.४७ टीएमसी (१६ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ६.०६ टीएमसी (१६ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ८.७९ टीएमसी (१४ टक्के) पाणी शिल्लक राहिले आहे.

पुणे विभागात ३१८ टीएमसी पाणी पुणे विभागातही यंदा गतवर्षीपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. मात्र सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या विभागातील एकूण ७२६ धरणांमध्ये यंदा जवळपास ३१८ टीएमसी (५९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला १०० टक्के पाणी असलेल्या उजनी धरणात यंदा २२.३२ टीएमसी (४२ टक्के) चल पाणीसाठा आहे. धरणाचा अचल पाणीसाठा विचारात घेता एकूण ८५.९७ टीएमसी (७३ टक्के) पाणी आहे. कोयना धरणातही चल व अचल मिळून ८१.७८ टीएमसी (७८ टक्के) पाणी शिल्लक आहे. विभागातील इतर प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २७६.३२ टीएमसी (६३ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २५.८५ टीएमसी (५४ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १५.५१ टीएमसी (३१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

नाशिक विभागात पाणीसाठा ४४ टक्क्यांवर नाशिक विभागातही यंदा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा तुलनेत जवळपास ३० टक्क्यांनी कमी आहे. विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये ९२.८६ टीएमसी (४४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नाशिक, नगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने आतापासून उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ६४.१६ टीएमसी (५९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १९.३६ टीएमसी (४६ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ९.३३ टीएमसी (२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

कोकणात समाधानकारक स्थिती दिवसाच्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे कोकणातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक असले तरी इतर विभागांच्या तुलनेत समाधनकारक स्थिती आहे. कोकण विभागात सध्या ६९ टक्के पाणी शिल्लक असून, गतवर्षी याच तारखेला ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा ७५.७४ टीएमसी पाणी आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९.०१ टीएमसी (६८ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १४.२९ टीएमसी (८३ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पांत १२.४३ टीएमसी (६३ टक्के) पाणीसाठा आहे. यात पालघर जिल्ह्यातील धामणीत ८२, कवडासमध्ये ९४, ठाणे जिल्ह्यातील ऊर्ध्व घाटघर धरणात ८६, भातसामध्ये ९८ तर निम्म चौंडे धरणात २१ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणात ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

विदर्भात यंदाही पाणीसाठा चिंताजनक  विदर्भात सलग दुसऱ्या वर्षी धरणांची पाणीपातळी खालावली असल्याने पाणी स्थिती चिंताजनक होत आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात यंदा ३९.३५ टीएमसी (२४ टक्के), तर अमरावती विभागात ६५.७५ टीएमसी (४४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अमरावती विभागात अवघे ३२ टक्के, तर नागपूर विभागात ३० टक्के पाणी होते. यंदा नागपूर विभागातील धरणांची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा आणि पेनटाकळी धरणे तळाशी गेली असून, अमरावतीच्या ऊर्ध्व वर्धा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द आणि बावनथडी, गाेंदियातील सिरपूर, नागपूरमधील खिंडसी, तोतलाडोह, वर्धातील निम्न वर्धा आणि बोर या धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती  ४४६ १४८.०४  ६५.७५ ४४
औरंगाबाद  ९६४ २६०.२७  ४०.५० १६
कोकण  १७६ १२३.९२ ७५.७४   ६९
नागपूर ३८४ १६२.६५  ३९.३५ २४
नाशिक  ५७१ २११.९७  ९२.८६ ४४
पुणे ७२६ ५३७.३८ ३१७.६८ ५९
एकूण ३२६७ १४४३.८८  ६४१.८७ ४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com