पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने भूजल पातळी झपाट्याने खालावली आहे. यामुळे धरणांमधील पाण्याचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून, चार धरणांमधील पाणीसाठा मृतपातळीत (अचल) पोचला आहे. सध्या शहरांना बंद पाइपलाइनद्वारे; तर येडगाव व वीर धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व २५ धरणांमध्ये अवघा १८.६१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरणात उणे २०.१२ टीएमसी म्हणजेच उणे २७.५६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. आगामी काळात पुणे शहरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.  

पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठी एकूण २५ धरणे आहेत. या धरणांतील चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी; तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना पाणीपुरवठ्यासाठी होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने धरणांतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा १८.६१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा वेळेवर पाऊस न झाल्यास हा पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

नाझरे, पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, टेमघर या चारही धरणांतील चल साठा (उपयुक्त) संपुष्टात आला आहे. उर्वरित धरणांमध्ये अल्प पाणीसाठा आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असल्याने बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार आहे.  

सध्या मुळशी धरणांत २.९३ टीएमसी म्हणजेच १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पवना धरणात २.१८ टीएमसी म्हणजेच २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. येडगाव धरणातून डाव्या कालव्याला एक हजार सहा क्सुसेकने तर वीर धरणातून ८२७ क्सुसेकने विसर्ग चालू आहे. वीर धरणातून उजव्या कालव्याला १५५० क्सुसेकने विसर्ग सुरू आहे.

तसेच वडिवळे धरणातून १५०, खडकवासला धरणातून १६४, गुंजवणीतून २०० क्सुसेकने बंद जलवाहिनीद्वारे पुणे व पिंपरी शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पूर्व भागातील पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, खेड या तालुक्यांतील काही गावांना दिलासा मिळत असला, तरी उर्वरित ठिकाणी तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा, टक्केवारी (पाणीसाठा टीएमसीमध्ये) ः माणिकडोह ०.२८ (२), येडगाव ०.१९ (६), वडज ०.०१, विसापूर ०.०६ (७), कळमोडी ०.२७ (१८), चासकमान ०.३२ (४), भामा आसखेड ०.९८ (१२), वडीवळे ०.४४ (४०),  आंद्रा १.४५ (४९), पवना २.१८(२५), कासारसाई ०.१४ (२४), मुळशी २.९३ (१५), वरसगाव १.४२ (११), पानशेत २.७३ (२५), खडकवासला ०.५५ (२७),  गुंजवणी ०.७९ (२१), नीरा देवघर ०.३८ (३), भाटघर १.७१ (७), वीर १.७८ (१८).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com