राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर; मराठवाडा, विदर्भात मात्र स्थिती चिंताजनकच

राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर; मराठवाडा, विदर्भात मात्र स्थिती चिंताजनकच
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर; मराठवाडा, विदर्भात मात्र स्थिती चिंताजनकच

पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेशा पाणीसाठ्याअभावी स्थिती चिंताजनकच आहे. सोमवारी (ता.१९) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ८७४.६४ टीएमसी (६१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ५८ टक्के पाणी उपलब्ध होते.  विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात सर्वात कमी २८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाड्यात ३१ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात ३९ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ८५ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ६० टक्के आणि कोकण विभागात ८६ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा ३ टक्क्यांनी अधिक आहे. गतवर्षी अमरावती विभागात ४३ टक्के, औरंगाबाद विभागात १९ टक्के, नागपूर ४० टक्के, पुणे ८० टक्के, नाशिक ५६ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा झाला होता. 

जायकवाडी भरले, मात्र मराठवाड्यातील धरणे रिकामी पावसाअभावी राज्यातील दुष्काळाचे केंद्र असलेल्या मराठवाड्याला सातत्याने तीव्र पाणी टंचाई सोसावी लागत आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने गोदावरीला महापूर आल्याने जायकवाडी धरण भरले. जायकवाडी धरणाच्या अचल साठ्यात २६.०५ टीएमसी, तर चल साठ्यामध्ये ७०.१५ टीएमसी (९२ टक्के) असे एकूण ९६.२० टीएमसी (९४ टक्के) पाणी आहे. मात्र मराठवाड्यातील उर्वरीत धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिल्याने बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ७.७३ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के, मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ३.४३ टीएमसी (९ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ३.४३ टीएमसी (५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात पाणीच पाणी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात पाणीच पाणी झाले. राज्यातील एकूण पाणीसाठ्यापैकी निम्म्याहून अधिक पाणीसाठा पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत आहे. विभागातील प्रमुख धरणे ओसंडून वाहिली असून, सध्या ४५५.४२ टीएमसी (८५ टक्के) पाणीसाठा आहे. उजनी, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही धरणातून मोठा विसर्ग करावा लागला. राधानगरी, वारणा धरणातून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१९.१८ टीएमसी (९५ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २५.१२ टीएमसी (५२ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये ११.१२ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या लघू, मध्यम धरणांत अपुरा पाणीसाठा उत्तर महाराष्ट्रातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यांतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. नाशिक मधील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणही भरले. नगर, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. मोठी धरणे भरली असली तरी मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये मात्र पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. नाशिक विभागातील सर्व ५७१ प्रकल्पांमध्ये मिळून ४३.०६ टीएमसी (२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये १०४.९१ टीएमसी (७९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १४.८० टीएमसी (३५ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ८.२२ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

कोकणातील धरणे ओसंडून वाहिली सह्याद्री वरून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांमुळे कोकण विभागातील सर्वच धरणे ओसंडून वाहिली. यामुळे नद्यांना मोठे पूर आल्याने शेती आणि गावे पाण्यात गेली. कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये १०६.७४ टीएमसी (८६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८१.६४ टीएमसी (९४ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १२.९३ टीएमसी (७५ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १२.१६ टीएमसी (६१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

पूर्व विदर्भात चिंताजनक स्थिती जोरदार पावसाअभावी पूर्व विदर्भातील पाणीसाठ्याची स्थिती अद्यापही चिंताजनक झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६३.६७ टीएमसी (३९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गडचिरोलीतील दिना, गडचिरोलीतील बावनथडी धरण मृत पातळीत आहे. तर नागपूरमधील तोतलाडोह धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१.२९ टीएमसी (३४ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये १२.६७ टीएमसी (५७ टक्के) तर ३२६ लघू प्रकल्पात ९.७१ टीएमसी (५४ टक्के) पाणीसाठा आहे.

पश्चिम विदर्भात अवघ २८ टक्के पाणी   पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ४१.२९ टीएमसी (२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतर्षीप्रमाणेच यंदाही अमरावती विभागात पाणीसाठ्याची स्थिती गंभीर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण अचल पातळीत आहे. अकोल्यातील वाण, अमरावतीतील उर्ध्व वर्धा, बुलडाण्यातील पेनटाकळी आणि यवतमाळमधील बेंबळा वगळता विभागातील इतर सर्व प्रमुख धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २५.०१ टीएमसी (२९ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये १०.९१ टीएमसी (४६ टक्के) तर ४११ लघू प्रकल्पात ५.३७ टीएमसी (१५ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.   

 
राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४६ १४८.०४ ४१.२९ २८
औरंगाबाद ९६४ २६०.२७ ७९.५८ ३०
कोकण १७६ १२३.९२ १०६.७४ ८६
नागपूर ३८४ १६२.६५ ६३.६७ ३९
नाशिक ५७१ २११.९७ १२७.९३ ६०
पुणे ७२६ ५३७.०३ ४५५.४२ ८५
एकूण ३२६७ १४४३.८८ ८७४.६४ ६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com